गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिडपट वेतन लागू करा : आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी





गडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील नगरपरिषद, पोलीस, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार दिडपट वेतन देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्पीय बाबींवर बोलतांना आमदार भाई जयंत पाटील म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिडपट वेतन आणि भत्ते मिळतात मात्र तेच लाभ इतर कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे नक्षलग्रस्त जिल्ह्यातील स्थानिक कर्मचारी लोकांना दिडपट वेतन आणि भत्ते भत्ता मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने अभ्यास करावा आणि सर्वांना दिडपट वेतन आणि भत्ते दिले जावे.

उल्लेखनीय की, शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकी निमित्ताने आमदार भाई जयंत पाटील गडचिरोली येथे आले असता गांधी चौकातील जाहीर सभेदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी त्यांनी भाई रामदास जराते यांच्या माध्यमातून वेतन, भत्ते आणि अडचणींबाबत विचारपूस केली, त्यावेळी गडचिरोली मुख्यालयातील ९०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना दिडपट वेतन आणि भत्ते यांचा लाभ मिळत नसल्याची माहिती समोर आली होती. सदरची अडचण सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार भाई जयंत पाटील यांनी दिले होते.

भाई जयंत पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी याबाबत सरकार सकारात्मक असून अधिवेशन संपताच बैठक घेवून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन दिले.

भाई जयंत पाटील यांच्या विधिमंडळातील पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिडपट वेतन आणि भत्ते मिळण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post