देशातील काही राज्यांच्या आगामी विधानसभा व सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन बुधवारी भाजपने आपली केंद्रीय निवडणूक समिती व संसदीय मंडळ समिती स्थापन केली. या समितीतून केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीयमंत्री जुएल ओरांव व माजी केंद्रीयमंत्री शाहनवाझ हुसैन यांच्यासारख्या बड्या नेत्यांना वगळले आहे पण त्याच बरोबर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा व केंद्रीय मंत्री व आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासहित अन्य ६ नव्या चेहऱ्यांना समाविष्ट करून घेतले गेले. या निर्णयाचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संदर्भात भाजपचे नेते व माजी राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षात पूर्वीसारख्या निवडणुका होत नाहीत. प्रत्येक पद हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्याने भरले जाते असा खळबळजनक दावा केला आहे.
स्वामी यांनी ट्विट करत जनता पार्टीच्या सुरूवातीच्या दिवसात व भाजपामध्येही पदाधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी निवडणुका घेतल्या जात असत व पक्षाच्या घटनेतही तसे नमूद करण्यात आले होते. पण आताच्या भाजपमध्ये अशी कोणतीही निवडणूक घेतली जात नाही, प्रत्येक पदावर मोदींच्या सहमती असलेला नेता नियुक्त केला जातो, अशा शब्दांत पक्षावर व मोदींवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय निवडणूक समितीचे महत्त्व
भाजपमध्ये केंद्रीय निवडणूक समितीचे व संसदीय मंडळ समितीचे महत्त्व असते. कारण ही समिती पक्षातील सर्वोच्च समिती मानली जाते, व या समितीच्या सहमतीने एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व पक्षातील महत्त्वाची पदे यांच्यासंदर्भात निर्णय घेतला जातो.
बुधवारी या समितींमध्ये पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संघटक महामंत्री बीएल संतोष, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रीय महासचिव ओम माथूर आदींना स्थान देण्यात आले आहे.
Tags:
दिल्ली