भंडारा, :- मागील सरकारच्या काळात खरेदी केलेले धान्य सरकारला सापडलेच नाही. तसेच मागच्या वेळी केलेल्या धाण खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी धान्याचा बोनस देण्याची नवी पद्धत शोधली जात असून त्यावर काम सुरू आहे, अशी माहितीही दिली. ते सोमवारी भंडाऱ्यात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, धाण उत्पादकांचा बोनस गेले काही वर्षे मिळत नाही. त्यांना अधिकची मदत झाली पाहिजे हा माझा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मनोदय आहे. मागील काळात धाण खरेदीत भ्रष्टाचार झाला आणि बोनसच्या नावाच्या अनागोंदी कारभार झाला. हा कारभार बंद झाला पाहिजे. शेतकऱ्याचे धान्य खरेदी झालेच पाहिजे आणि तेही वेळेत खरेदी व्हावे. त्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये.
शेतकऱ्याशी बेईमानी सहन केली जाणार नाही
शेतकऱ्याच्या नावाने व्यापाऱ्याकडूनच धाण टाकले जाते. तेही होऊ नये. अशाप्रकारे अनेक बोगस संस्था तयार झाल्या. ज्यांच्याकडे जागा नाही. साठवणूक क्षमता नाही अशाही संस्था आहेत. भंडाऱ्यात मागच्या वेळी खरेदी केलेले कागदावरील धान्य गायब आहे. ते सरकारला सापडलेच नाही. ते आता शोधावे लागेल. ते धान्य सापडले नाही, तर ज्यांनी या धान्यात भ्रष्टाचार केला त्यांना धरावे लागेल, असा इशारा फडणवीसांनी दिला.
शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्याने मदत लाटू नये. म्हणून वेगळी व्यवस्था उभी केली जात आहे. त्याला बोनस म्हणा किंवा मदत म्हणा, पण यंदा आम्ही आमच्या शेतकऱ्याला चांगली भरघोस मदत देणार आहोत. लवकरच ही प्रक्रिया पारदर्शीपणे पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
Tags:
भंडारा