देसाईगंज-
गडचिरोली जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या वतिने जिल्ह्यातील सर्व सामान्य गोरगरीबांच्या मागण्यांना घेऊन हजारो पक्ष पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या सहभागाने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातुन पैदल मोर्चाची सुरुवात केली आहे. यात देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग नोंदवत नागपुर येथील विधानभवनाकडे आगेकूच केली असुन आठ दिवस चालणारा पैदल मोर्चा तब्बल १७५ किलोमीटरचा टप्पा गाठुन विधानभवनावर धडकणार आहे.
सदर पैदल मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे करीत आहेत.त्यांच्याच नेतृत्वात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे, देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नेते परसराम टिकले, उपाध्यक्ष नितीन राऊत, देसाईगंज शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पिंकु बावणे,सुरेश मेश्राम,महिला काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षा यामिनी कोसरे,रजनी आञाम, मंदा बेंद्रे,मनोज ढोरे,सदानंद दोनाडकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असुन तिसऱ्या दिवशी ब्रम्हपुरी ते नागभिड पर्यंतचा टप्पा पुर्ण केल्या गेला आहे.
दरम्यान गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातुन सुरुवात करण्यात आलेल्या काँग्रेसच्या पैदल मोर्चाने आतापर्यंत गडचिरोली-आरमोरी-ब्रम्हपुरी- नागभिड पर्यंतचा टप्पा पुर्ण केला असुन १७ डिसेंबर पासुन नागभिड ते भिवापुर पर्यंतचा टप्पा पुर्ण करण्यात येणार आहे.त्यानंतर भिवापुर- उमरेड-उटी(पांचगाव) व त्यानंतर नागपुर विधानभवना पर्यंत पैदल मोर्चा आगेकूच करणार असल्याचे देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने माहिती देण्यात आली आहे.
Tags:
gadchiroli