गडचिरोली :- राजाराम परिसरातील पत्तीगाव येथील अंगणवाडी सेविकेचे अपहरण करून तिचे दोरीने हात बांधून मारहाण करण्यात आली. नंतर तिला जंगलात सोडून देण्यात आले, असे बयाण या महिलेने पोलिसांना दिले आहे. या घटनाक्रमामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सुरेखा सुरेश आलाम (वय ४०) असे अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. सुरेखा ही राजाराम जवळील कोंकापरी येथील रहिवासी आहे. ती पत्तीगाव येथील मिनी अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. कोंकापरीपासून पत्तीगाव पाच किमी अंतरावर आहे. ती गावावरून ये-जा करायची. १४ जानेवारीला अंगणवाडीत जातो म्हणून 5 ती घरून निघाली. मात्र, सायंकाळ होऊनही ती परत आलीच नाही. तिची शोधाशोध केली असता ती मिळूननातेवाइकांनी याबाबतची तक्रार राजाराम उपपोलिस ठाण्यामध्ये दाखल केली. मात्र, ती १५ जानेवारीला सायंकाळी गावाजवळच आढळून आली. तिला तत्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.
पोलिसांनी तिचे बयाण घेतले असता ती पत्तीगाव येथे जात असताना तिचे दोन्ही हात काही जणांनी दोराने बांधले. तिला मारहाण करून जंगलात सोडून दिले. ती कशीबशी गावापर्यंत पोहोचली असे बयाण तिने पोलिसांना दिले आहे. मात्र, नेमके असे घडले असावे की नाही, याबाबत पोलिसांना शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राजाराम पोलिस अतिशय दक्षपणे करीत आहेत. पोलिसांच्या चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईल.
Tags:
अहेरी