शाळेत शिक्षक वेळेवर येत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी केले रस्ता रोको आंदोलन

जिवती :- तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक येतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 'आम्हाला शिक्षक द्या हो' म्हणत शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रस्ता जाम केल्याची घटना समोर आली असून तेजीने समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे.

शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी शिक्षकासाठी शेवटी पंचायत समितीच्या दिशेने गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतर पायी प्रवास करीत निघाले. हे प्रकरण पाहत गावचे पोलिस पाटील यांनी टेकामांडवा

येथील पोलिस प्रशासनाला माहिती दिली असता सहायक उपपोलिस निरीक्षक रवींद्र म्हैसकर हे ताफ्यासह शाळेत पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घेतल्या. तालुक्यात ५८ शिक्षकांची रिक्त पदे आहेत. चार दिवसांत शिक्षक देऊन समस्या सोडवू असे आश्वासन केंद्रप्रमुख बावणे यांनी दिले. विशेष म्हणजे, मुलांना दुपारचे जेवणही नव्हते भर उन्हात चटके सहन करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी आंदोलन केले. विद्यार्थी सांगत होते की, आम्ही यावर्षी क्रीडा स्पर्धांची तयारीही केली; परंतु, आम्हाला क्रीडा संमेलनात सहभागी करून घेतले नाही. यावेळी पोलिस पाटील, पोलिसांनी मुलांची समजूत काढली.


सुटी मंजूर नसतानाही शिक्षक जातात रजेवर

■ पाटागुडा येथील जि.प. शाळा इयत्ता सातवीपर्यंत असून ७२ एवढी पटसंख्या आहे. या शाळेतील शिक्षक कधी सुटीवर तर कधी अवेळी येतात. रजा मंजूर नसताना देखील सुटीवर जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वरिष्ठांना सहा महिन्यांपासून कळविण्यात येत असल्याचे शा.व्य. समितीचे अध्यक्ष व्यंकटी जाधव यांनी सांगितले.

पाटागुडा येथील दोन शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून चौकशी सुरु आहे. चौकशीअंती दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आजपासून जिल्हा परिषद शाळा पाटागुडा येथे दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

- डॉ. भागवत रेजीवड, गटविकास अधिकारी पं. जिवंत

बातमी झूम करून बघा
👇👇👇👇👇


Post a Comment

Previous Post Next Post