ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक


कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आजच अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लागलीच ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. त्यांना अटक होणार याची खात्री होती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.


आज दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच ईडीचं पथक चौकशीसाठी हजर झालं. यानंतर ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले. मात्र दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला. तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान ‘आप’च्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. आज रात्रीच या प्रकरणी सुनावणी घेऊन केजरीवाल यांची अटक टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते केजरीवाल यांना समन्स बजावण्यासाठी निवासस्थानी आले आहेत. मात्र ईडीच्या पथकाकडे छापेमारी करण्यासाठीचे वॉरंट असून त्यांनी निवासस्थानाची तपासणी सुरू केलीहे. केजरीवाल यांची चौकशी सुरू केली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. मागच्यावर्षीपासून आतापर्यंत ईडीकडून केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आलेले आहे. मात्र केजरीवाल यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नाही.

प्रियंका गांधींची टीका

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या निमित्ताने अशा प्रकारे टार्गेट करणे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे. अशा प्रकारे राजकारणाची पातळी घसरणे ना पंतप्रधानांना शोभते ना त्यांच्या सरकारला. निवडणुकीच्या लढाईत तुमच्या टीकाकारांशी लढा, त्यांचा धैर्याने सामना करा आणि अर्थातच त्यांच्या धोरणांवर आणि कार्यशैलीवर हल्ला करा, ही लोकशाही आहे. परंतु अशाप्रकारे देशाच्या सर्व संस्थांच्या शक्तीचा वापर करून स्वत:चे राजकीय उद्दिष्ट पूर्ण करणे आणि दबाव आणून त्यांना कमकुवत करणे हे लोकशाहीच्या प्रत्येक तत्त्वाच्या विरुद्ध आहे.”

“देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत, सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते ईडी, सीबीआय, आयटीच्या दबावाखाली आहेत, एका मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकण्यात आले आहे, आता दुसरे मुख्यमंत्री देखील तुरुंगात आहेत. असे लाजिरवाणे दृश्य भारताच्या स्वतंत्र इतिहासात प्रथमच पाहायला मिळत आहे”,असंही त्या म्हणाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post