विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणातील दादा समजले जाणारे व सत्ताधारी पक्षात कायम कॅबिनेट मंत्रिपद बाळगणारे ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले न गेल्याने, नाईक समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत असताना लोकनेते आ. गणेश नाईक यांनी सातत्याने कॅबिनेट मंत्रिपद भूषवले आहे. तर, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पदाचे कामकाज हाताळ्याचा अनुभव असल्याचे लक्षात घेवून भाजपकडून संधी प्राप्त होणे आवश्यक होते. मात्र, तरीही नाईक यांना डावलल्यामुळे त्यांच्या ज्येष्ठ नेतृत्वाचा एकप्रकारे पक्षश्रेष्ठींनी 'अप्रत्यक्ष' का होईना अवमान केल्याची भावना नाईक समर्थकांमध्ये आहे.
तर, पहिल्या विस्तारातील मंत्र्यांना महत्वपूर्ण खातीवाटप करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तरात जरी आ. गणेश नाईक यांची वर्णी लागली तरी, हलके अथवा बिनकामाचे खाते त्यांच्याकडे वर्ग होण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे, गणेश नाईक या नावाभोवती जे वलय आहे. त्याला कुठेतरी धक्का यानिमित्ताने बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.