उत्तर प्रदेशातील एका नवरदेवाला कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्याच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अनुभवायला मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार कानपुर येथील एक नववधूने लग्नातील सर्व दागदागिने व घरातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. नव्या बायकोने केलेला हा पराक्रम पाहून बिचाऱ्या नवरदेवाच्या काळजाची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज तर तुम्हालाही आलाच असेल पण एवढंच दुःख देऊन ही नवरी थांबली नाही. उलट तिने पळून गेल्यावर पुन्हा आपल्या नवरोबाला कॉलही केला. कॉल वर या नववधूने जे सांगितलं ते ऐकून आता नवरदेवाला नक्की कशाचं दुःख जास्त झालं असेल याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.
कानपुर जिल्ह्यातील बिलाहौर पोलिसांना नवरदेवाने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच घडला मात्र बदनामीच्या भीतीने नवऱ्याच्या कुटुंबीयांनी याविषयी वाच्यता केली नव्हती. नवरदेवाचे नाव पूर्वीं अरविंद असे असून त्याने लग्न जमवून देण्यासाठी दोघांना ७० हजार रुपये दिले होते. या दोघांनी अरविंदला गया येथे नेऊन त्याचे लग्न रुची नावाच्या मुलीशी जुळवले. ३० सप्टेंबरला त्याला रुचीचा फोटो दाखवण्यात आला व १ ऑक्टोबरला लगेचच गया येथील एका मंदिरात या दोघांचा विवाह सुद्धा पार पडला. माघारी येताना अरविंद हा बायकोला बरोबर घेऊनच आला होता. लग्न जुळल्याच्या आनंदात कदाचित त्याने रुची विषयी फार चौकशी केली नसावी, हीच घाई आता त्याला चांगलीच भोवली आहे.
दरम्यान लग्नाच्या दोन दिवसानानंतर रुचीने म्हणजेच नव्या नवरीच्या घरातील ३० हजार व दागिने घेऊन पळ काढला. यानंतर या नवरीने एक कॉल केला होता. जेव्हा तिने अरविंदला सांगितले की, माझे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही त्यामुळे मला यापुढे कॉल करू नकोस. एवढं बोलून तिने कॉल कट केला. याबाबत सध्या पोलीस तपास सुरु असून लग्न जुळवणाऱ्या दोघांचा हा प्लॅन असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
Tags:
उत्तर प्रदेश