२१ दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
(बीड) : पती आवडत नाही म्हणून पत्नीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याचा विवाह केवळ २२ दिवसांपूर्वी झाला होता. ७ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला होता. मृत पतीच्या आईला संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलीस तपासात पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून
केल्याची कबुली दिल्याने हा प्रकार स्पष्ट झाला. पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (रा. निपाणी जवळका तांडा, गेवराई) असे मृत पतीचे नाव आहे. पत्नी शीतलने हे कृत्य केले आहे.
या दाम्पत्याचा विवाह १४ ऑक्टोबर रोजी पौळाचीवाडी येथे झाला होता. त्यानंतर पती पांडुरंग आवडत नाही म्हणून शीतल त्याच्यासोबत सतत भांडण करत होती. ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या दरम्यान ते दोघे झोपले असताना ११.३० च्या दरम्यान शीतल खोलीबाहेर आली व चक्कर आल्याचे नाटक करत पती पांडुरंग गार पडला असून, हालचाल करत नसल्याचे सांगितले. त्यानंतर तत्काळ पांडुरंग यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर सुनेनेच आपल्या मुलाला मारल्याचा संशय मृत पांडुरंग यांच्या आई-वडिलांना होता. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासामध्ये शीतल हिने आपणच पतीचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी शीतलला ताब्यात घेतले आहे.
Tags:
बीड