गडचिरोली:- वाघांचा वावर असलेल्या गावातील तरुण बेरोजगार युवकांचा गट तयार करून त्यांना वन विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येईल. युवकांना मानधन देण्यात येईल त्यामुळे जिल्ह्यात वाघांच्या हल्ले नियंत्रित करता येतील तसेच स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल. अधिवासापेक्षा संख्येने जास्त असलेले वाघ केंद्र सरकारच्या परवानगीने मागणी केलेल्या मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड राज्यांतील वनात स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन वनमंत्री सधीर मनगंटीवार यांनी दिले
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी विशेष बैठकीत आ. कृष्णा गजबे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात वाघ, हत्ती व अन्य हिंस्र वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, पीकहानी व नागरिकांच्या घरांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात वन विभागाचे जलद प्रतिसाद दल (क्युआरटी) स्थापन करून प्रभावी उपाययोजना करण्याबाबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. त्यावर मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या जलद प्रतिसाद दलाची (क्युआरटी) आवश्यकता असल्याचे मान्य केले. वनक्षेत्रफळाच्या तुलनेत वाघांना लागणारे अधिवास क्षेत्र अपुरे पडत असल्याने वनातील वाघ गावे व शेतामध्ये येऊन मानवावर हल्ला करीत आहेत. अधिवासापेक्षा संख्येने जास्त असलेले वाघ दुसरीकडे नेले जातील.
Tags:
gadchiroli