नाटक - आम्ही गरीब माणसं स्वंप्नांचे मालक आहोत सर..पण साले स्वप्नही आजकाल बेईमान होतात.ऱात्रिला सोबत असतात .




भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही भूभाग झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो. घनदाट जंगल,आणि त्यात असणारे वन्यजीव हे पर्यटकांना आकर्षून घेतात. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने जगाला भुरळ घातली ते ठिकाण म्हणजे झाडीपट्टी. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान तसेच इटिया डोह प्रकल्प हे पर्यटन स्थळ झाडीपट्टीची शान आहे . झाडीचा रान मेवा सर्वदुर परिचित आहे इथल्या मातीचं अनेकांना आकर्षण आहे.भंडारा जिल्ह्यातुन वाहणारी वैनगंगा नदी आणि त्यावर बांधलं गेलेलं गोसे धरण अनेकांना खुनावतं. नजर पुरेल तिथवर पाणीचपाणी असं गोसेधरणाचं अनेक पर्यटक वर्णन करतात. बौद्ध संस्कृतीचे पौराणिक दर्शन घडविणारे ऐतिहासिक शहर पवनी भंडारा जिल्ह्यातील, म्हणजे झाडीपट्टीतच आहे . चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर हे क्रांतीचे शहर म्हणून ओळखलं जातं तेही झाडीपट्टीच्या मातीत आहे . एकुणच झाडीपट्टीचा अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी झाडीपट्टीत आहेत भात ,गहु,हरबरा,तुर ,उडीद,मुंग,भुइमूग ही येथील मुख्य पिके आहेत . भंडारा जिल्हा भातपिकासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच कदाचित भंडारा जिल्हा भातावर भिल्ला अशी म्हण अस्तित्वात आली असावी.

 झाडीपट्टी जशी जल , जंगल आणि अनेक पिकांसाठी प्रसिद्ध आहे तशी कला क्षेत्रातही खास ठसा आहे. दंडार ,तमाशा,भारूड,गोंधळ,भुलबाई इत्यादी लोककला आणि त्यांचा इतिहास फार जुना आहे. काही अभ्यासक कलेला १३० वर्षांची परंपरा असल्याचं सांगतात. नाटक ही वरील कलांतुन झालेला विकास आहे असं मानलं जातं. त्यामुळेच झाडीपट्टीतील नाटकांचा उगम , त्यांची मुंळ वरील कलाकृतीत शोधतात असं लक्षात येतं. आणि ते काही प्रमाणात खरं वाटतं . कारण त्यानंतर झाडीपट्टीत पौराणिक नाटकांची फार चलती होती. लोकांच्या आवडीनिवडी बदलत गेल्या , तशा सुधारणाही झाल्यात. पूर्वी स्त्रीपात्र पुरुष करायचे. मिशा भादरुन साडीचोळी घातलेल्या पुरुषांना रंग मंचावर बघुन अर्थाततच कुणालाही आश्चर्य वाटलं नाही . आणि मिशाभादरुन साडीचोळी घालणारा मानुसही लाजला नाही. आम्ही लहान असतांना 'सुगंधा वनवास', 'सिता स्वयंवर', 'वस्त्रहरण'...इत्यादी महाभारत आणि रामायणावर बरीच नाटक व्हायची. रात्री १०-११ वाजता सुरु होणारी नाटकं दिवस उजळलं तरी चालू असत. कधी-कधी आम्ही मुलं झोपलेलेच असायचो. आई किंवा आजी घरची पोती किंवा तत्सम साहित्य घेऊन जायची. जागा पोती अंथरूण आरक्षित करायची. नंतर कुणीतरी येउन आम्हाला उठवून नाटक बघायला घेऊन जायचे. नाटक फुकट असायचं. त्यामुळे प्रचंड गर्दी असायची. अंक संपल की लघुशंकेसाठी पांगापांग व्हायची. ह्या साऱ्या भानगडीत आपली जागा कुणी बळकाउ नये म्हणून काळजी घ्यावी लागायची आजूबाजूला चहापान्यांची फिरती दुकानं असायची. चारआण्याला कपभर चहा मिळायचा. चहा पाचाकट असायचं पण झोपेचा तान कमी करण्यासाठी प्रेक्षक चहा घ्यायचे.चहाचा कप खाली करतांना चहा 'ढर्रा 'होता अशी टिप्पणी करीत.चहावाल्याकडे कप आणि पैसे द्यायचे 'ढर्रा' चहा या शब्दावरून कधी-कधी दुकानदार आणि ग्राहकांमध्ये तु-तु मै-मै जुंपलं जायचं. ती मजा काही वेगळीच असायची. नाटक मंडळ आणि कलाकार गावचेच असायचे. त्यामुळं त्यांचे कौतुक, प्रोत्साहन, प्रेम, मंडळाला मदत म्हणून प्रत्येक अंकानंतर बक्षीस-देणगी दिली जायची. चंगलं पात्र रंगवल म्हणून वैयक्तिक बक्षीसं दिली जायची. गावातील मानवाईक,सरपंच,कोतवाल,पोलिस पाटील आणि काही श्रीमंत लोकांकडून देणगी दिली जायची.स्पिकरवर त्यांच्या नावाची यादी आणि प्राप्त बक्षिसे तशीच देणगी पुकारली जायची.

हळूहळू काळ बदलत गेला.ही नाटक मागे पडू लागली. काही नामवंत लेखकांची नावं, त्यांची नाटकं पुढे येउ लागली.खरे तर हा काळ बदलत जाण्याला माझ्या मते काही कारणे झालीत.त्यात सुशिक्षीतांच प्रमाण वाढलं.वाचन वाढलं त्यामुळेच कदाचित हे लेखक आणि त्यांची नाटकं माहित होउ लागली.हे हळुवार घडत गेलं त्यामुळे बदलत स्वरूप लक्षातही आलं नाही.पण ह्याच काळात पुणे,मुंबई,नागपूरच्या स्त्री पुरुष कलाकारांना झाडीपट्टीत मान मिळु लागला.मीना देशपांडे,वत्सला पोलकमवार,माधुरी कोकण,इत्यादी तर मधु जोशी, प्रभाकर आंबोने इत्यादी पुरूष कलाकार झाडीपट्टीत रमायला लागले. जवळपास गाव तिथे नाट्यमंडळं होती.त्यामुळे काही गावातील कलाकार आपल्याच मंडळीची नाटकं उभी करुन त्यात भूमिका करू लागले.प्रेक्षकांनीही त्यांना पसंती दिली. आर्थात बाहेरून येणारे कलाकार असल्याने नाटकाना खुर्ची ५ रु. ओटा न.१ ३ रु. ओटा न. २ २ रु. आणि स्त्रियांसाठी फक्त १ रुपया आणि पैसे असा दर आकरला जाऊ लागला. हा दर अर्थात फार जुना आहे. इथुनच मनोरंजन पैशात विकण्याची स्पर्धा सुरु झाली.
      आता गावागावातील मंडळं मोडकळीस आलीत.गावातील काही कलाकार पुणे,मुंबई, आणि नागपूरच्या कलाकारांसह नाट्यकंपनी स्थापु लागले.ह्या कंपन्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथे विस्तारु लागल्या.झाडीपट्टीतीलच लेखक हस्तलिखित नाटक लिहुन नावरुपास येउ लागले. आतापर्यंत हे लक्षात आलच असेल की १९९० चा हा काळ म्हणजे झाडीपट्टीतील नाटकांची तीन टप्यात विभागणी करावी लागली. पौराणिक नाटके,लिखित नाटके आणि हस्तलिखित लावणी प्रधान नाटके.
       नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे ४ थे झाडीपट्टी नाट्य संमेलन पार पडलं. त्यात अनेक मान्यवर व्यक्तीनी आपली मते मांडलीत.झाडीपट्टी रंगभूमीला रंगभूमी मानण्यापेक्षा झाडीपट्टी लोकरंगभूमी असं म्हटलं पाहिजे असा सुर एका वक्त्याने काढला.नाटक ३ अंकी ऐवजी चार अंकी होउ लागली.पहिल्या अंकात,डान्स,हंगामा,आणि मग नाटकाला सुरुवात. नाटक दोन भागात दाखवण्याची प्रथा केवल झाडीपट्टीतच आहे.खरे तर नाटक एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे.पण त्यात हंगमा,डान्स वैगेरेची घुसळण, झाल्याने नाटकाचं मूळ रुप मोडलं गेलं.बरे हे बदलतं स्वरूप किंवा ही मोडतोड प्रेक्षकांनी स्वीकारली की प्रेक्षकांच्या माथ्यावर मारल्या गेलीय?. हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. परंतू हे बदल हळूहळू येथील प्रेक्षकांच्या अंगवळणी पडलेत. नाट्यमंडळांनी कलाकारांनी आणि येथील लेखकांनी हा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी हा बदल स्विकारला असं मग हेच त्रिकुट मानायल लागलं. म्हणूनच नाटकांची नावंही विचित्र असायची १९९० नंतर झाडीपट्टीत लेखकांची खाण निर्माण झाली.एक लेखक एका वर्षात दोन तीन नाटकं लिहू लागले. कारण दिवाळीनंतर गावागावांत मंडई,जत्रा त्यानंतर मकरसंक्रांत त्यानंतर शंकरपट आणि त्या निमित्त नाटकांचे प्रयोग. मग प्रेक्षकांना आकर्षूण घेण्यासाठी नाटकांचे शीर्षकही द्विअर्थ ठेवण्याची प्रथा सुरु झाली.प्रत्येक लेखक उत्तम कलाकार असेलच असं अनेकदा होत नाही.पण झाडीपट्टीतील लेखक हाच त्याच्या नाटकात नायकाची भुमीका करतांना दिसतोय. सततच्या प्रयोगांमुळे बरेचदा इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे बोलायची सवय इथल्या कलाकारांना झाली आहे.पाठांतराची उणीव दिसून येऊ लागली.एखाद्याला लेखकाने चांगलं नाटक लिहलं तर त्याला न्याय देण्याची कुवत झाडीपट्टी कलाकार दाखत नाही . ब्रम्हपुरी येथे पार पडलेल्या ४थ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनात एका वक्त्याने राजू बोरकरांची नाटकं छान असतात पण कलाकारांनीच ती नाकारली. का नाकारली माहित नाही असं म्हटलं. आज त्याचा खुलासा करण्याची संधी मिळालीय. माझं 'संघर्ष' नाटक होतं. राजकारण ते समाजकारण असा प्रवास करणारं गंभीर स्वरूपाचं नाटक होतं. नाटकातिल एका कलाकारने नको तिथे विनोद केला.मी संवाद लिहिले होते ते असे," आम्ही गरीब माणसं स्वंप्नांचे मालक आहोत सर..पण साले स्वप्नही आजकाल बेईमान होतात.ऱात्रिला सोबत असतात . आणि दिवस उजडताच साथ सोडतात. आमच्या झोपड्यांनी कधी उंच इमारतींशी स्पर्धा केली नाही असं नाहीए,सर.पण ही आमची तत्वांची भाषा आहे ना हीच साली वारंवार आड आलिय. मग आमच्या झोपड्यांची उंची कधी वाढलीच नाही. एक मात्र झालं सर, कधी शहराच्या सौंदर्यकरणाच्या नावावंर आमची झोपडी पाडली गेलीय, तर कधी जात धर्माच्या नावावर दंगलित ती जाळली गेलीय. भविष्याचे सुंदर स्वप्न आम्हीही पाहिले होतेत सर, पण दंगलीच्या नावावर ते साले असे करपून निघालेत " हे संवाद त्या कलाकाराला बोलायचे होते. तो बोललाच नाही. पण अशा क्षणिही त्याने विनोद करण्याचा मुर्खपणा केला. मला प्रचंड राग आला. मी त्याला ओढायला स्टेजवर जाणार तोच मला एका कलाकार मित्राणे थांबवलं. नंतर मी त्याल म्हटलं, पुणे मुंबईचं नाव सांगता तर तसा अभिनय करा. असाच एका प्रसंगी विनोदी कलाकाराने मृत्यूसारख्या भावनिक प्रसंगी आपला विनोद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रेक्षकांनी त्याची बरीच कानउघडणी केली. एकुण काय तर झाडीपट्टीत प्रेक्षकांना काहि कळत नाही अशा समजुतीत कलाकार वागतांना दिसतात . त्यांना प्रसंगांच गांभिर्य लक्षात घेण्याची गरज वाटत नाही .आपण आचकट विचकट काहीही केलं तरी प्रेक्षक हसतात. अशी समज हे कलाकार करुन बसलेत. पाठांतर करुन एखाद्या दर्जेदार साहित्यकृतीला न्याय मिळवून द्यावा ही कल्पना झाडीपट्टीतील कलाकारांनी नाकारलेली दिसते.

झाडीपट्टी रंगभुमी बदलीय असा सुर कोण्त्या अर्थाने काढावा? इथले लेखक स्वतः लिहतात म्हणून? मला वाटतं येथील कलाकार आणि लेखक पैशाच्या मागे लागलेत. त्यांना रोज प्रयोग हवे असतात. त्यामुळे तालिम करून लेखकाला अभिप्रेत असलेल्या स्तिथीपर्यंत नाटक पोहचत नाही .  
         झाडीपट्टी रंगभुमिवर प्रत्येक नाटकांत अगदी प्रत्येक प्रवेशात लावणी असते. मुळ लावणी बाजूला असते. कुठल्यातरी हिंदी चित्रपटांच्या गाण्यावर लावणी नृत्य असतो. साधारण ५ ते ७ मिनटं हे नृत्य असतं. प्रत्येक नाटकांत एक छक्का असतो.पोलिस आणि नोकर ही ठरलेली पात्रं असतात. तमासगीरिणाचं नृत्य होणं मह्त्वाचं.ते कुठेही असलं तरी चालेल.त्यामुळे अनेकदा पोलिस आणि नोकर हे पोलिस रस्त्यातच किंवा भेटले त्या प्रसंगानुसार 'होऊन जाऊदे एक लावणी' म्हणतो. नोकरही मग असाच लावणीची फर्माईस करतो.आणि नटी मग कुठलाही नकार न देता लगेच नाचायला सुरुवात करते. खरे तर हा मोठाच विनोद वाटतो. कारण 'पैसा कितीही लागला तरी चालेल.पण नाच बंगल्यावरच झालं पाहिजे'अशी म्हण आपण अनेकदा ऐकतो.याचा अर्थ असा, की बाईला नाचवायला एक ताकत लागते.ती ताकत म्हणजे पैसा किंवा पद असतो.पूर्वी राजेमहाराजे अनेक स्त्रीया भोगयचे. जमीनदार भोगवस्तु म्हणून काही स्त्रिया ठेवायचे. आताही आपण मंत्र्यासंत्र्याचे लफडे बघतो,ऐकतो. अगदी अलीकडेच नेते स्त्री संकरात सापडल्याचे आपल्या वाचनातून किंवा ऐकण्यातुन गेले असेल. म्हणजे पद किंवा पैसा असणारीच माणसं स्त्रीला नाचवु शकतात. पण झाडीपट्टीत हे अतिशय सोपं करुन दाखविलं गेलंय इथे पोलिसही आणि नोकरही नटीला नाचवतात . अगदी रस्त्यावर, वाड्यावर एकटी दिसली तर नोकर किंवा हवालदार नटीला नाचवतात. हे म्हणजे ऐपत नसतांना,बाई वाड्यावर या म्हणन्यासारखं आहे.  
      नाटक हा प्रबोधनाचा सर्वात प्रभावी साहित्य प्रकार आहे.एक कादंबरी,लेख,कथा किंवा इतर साहित्य वाचक एकावेळी एकटाच वाचतो.परंतु नाटक एका वेळीं शेकडो हजारो प्रेक्षक बघतात.त्यामुळे त्यातून जाणारा संदेश छान,अर्थपूर्ण असला पाहिजे.परंतु १९९० नंतर झाडीपट्टीत हस्तलिखितांच प्रचंड पिक आलं.त्यात अश्लिल द्विअर्थि शीर्षकाची स्पर्धा बघायला मिळते.नावात काय आहे?असा साधा प्रश्न विचारला जातो.पण नावात बरच काही असतं.म्हणुनच लोक मुलांची नाव ठेवतांना मोहन,राम,सिताराम,भीमराव,अशी नावं ठेवतात.नावात काही खास असतं.नाहीतर लोकांनी मुलांची नावं चोर,लुटारु अशी ठेवली असती.तात्पर्य असा की जर पुस्तकाच्या आत वाचकांसाठी,प्रेक्षकांसाठी चांगलं लिहीलं असेल तर त्यांच कव्हर अश्लिलतेनं बदनाम करण्याची गरज का वाटावी? लेखक आणि कलाकार पैश्यांच्या मागे लागलेत का? लेखकांच्या हातून चांगली साहित्यकृती निर्माण झाली पाहिजे.नाटक म्हणजे चांगल्या वाईटाचं मिश्रण असतं.त्यातून वाईट हे पराभूत होतं आणि सत्याचा विजय होतो.हे कलात्मक दृष्टीने हाताळायाची लेखकाची कला असते.लेखक त्यासाठीच आपली प्रतिष्ठा पणाला लावतो.प्रेक्षक नाट्यगृहातून बाहेर पडतानां चांगले विचार घेऊन बाहेर पडला पाहिजे.तेच खऱ्या लेखकाचं यश असतं.प्रेक्षक व्यभिचारी, बलात्कारी,गुन्हेगारी,अशा विचारानी ग्रासला असेल तर लेखक कलमकसाई ठरतो. 
      १९९० नंतर झाडीपट्टी रंगभूमी आर्थिकदृष्ट्या फार श्रीमंत झाली.देशाच्या कुठल्याच भागात इतकी प्रचंड उलाढाल होत नाही.फक्त चार पाच महीण्यात १५/२० करोड रुपयांची उलाढाल होते असं सांगीतलं तर पुणे,मुंबईच्या लोकांना प्रचंड आश्चर्य वाटेल.पण हे सत्य आहे.जिथे इतकी उलाढाल आहे तिथे लेखक आणि कलाकारांनी स्वताच्या कलेशी प्रामाणिक रहायला काय हरकत आहे? एक खल पुरुष (खलनायक) म्हटलं की डोळे गरगरीत करून कर्कश आवाजात बोललं पाहिजे हे आवश्यक नाही.तरी झाडीपट्टी रंगभूमीवरील खलनायक अशाच प्रयत्नात असतो. कलाकारांच्या अनेकदा प्रवेश (एंट्री) चुकतात. अशावेळी जानता प्रेक्षक असेल तर तो ह्या गोष्टी अचुक हेरतो. त्यामुळे झाडीपट्टी रंगभुमिला गालबोट लागतो. ब्रम्हपुरी येथील चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनात झाडीपट्टी रंगभूमीचे अभ्यासू वक्त्यांनी टीकात्मक परीक्षण केले. त्या टिकांच स्वागत करून अपेक्षीत सुधारणा करणं ही गरज झाली आहे. 
       भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे झाडीपट्टीत कठीण भाषा प्रेक्षकांना समजत नाही अशी पळवाट काही कलाकार करतांना दिसतात. मग माहेरची साडी चित्रपट झाडीपट्टीच्या भाषेत नव्हता तरी चित्रपट गृहात झाडीपट्टीतील प्रेक्षक का टीकुन राहिला? मेहनत घेण्याची जिद्द टाळून सोपं तेवढं स्विकारण्याची मानसिकता येथील कलाकार आणि लेखकांनी बदलली पाहिजे. चागंल बोलायला आणि चांगल ऐकायला झाडीपट्टीतिल प्रेक्षक कायम तयार असतो. म्हणूनच इथल्या प्रेक्षकांवर,कठीण भाषा समजत नाही. असा शिक्का मारुन मोकळं होता येत नाही.कारण तो माहेरची साडी मन लावून बघतो त्यातील भावनिक प्रसंगावंर येथील प्रेक्षक रडतो. भाषेचा प्रश्न असता तर प्रेक्षकांनी असे चित्रपट नाकारले असते.त्यामुळे दिग्दर्शक वेशभुषा, संगीत इत्यादींचा स्व्तःवरील तान कमी करून ते वाटून घेता आले तर प्रत्येक क्षेत्राला न्याय देता येईल. चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनात सन्माननिय वक्त्यांचा हा सुर होता. आणि मी त्या सुरात सुर मिसळतो आहें
        शेवटी झाडीपट्टी रंगभूमीवर कितीही टीका झाली तरी ही रंगभूमी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलागुणांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे,मुंबईच्या कलाकारांना,अभ्यासकांना झाडीपट्टीचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे.  
राजू बोरकर-७५०७०२५४६७,लाखांदूर,जिल्हा - भंडारा

Post a Comment

Previous Post Next Post