मुलींनो प्रेमाच्या नावाखाली स्वतःची इज्जत घालून स्वतःचा जीव गमावून बसू नका.



चुकीच्या व्यक्तीवर आंधळा विश्वास, प्रेमाची आणि एकत्र जीवन जगण्याची, लग्नाची, लिव्ह इन रिलेशन शिप बाबतीत स्वप्नाळू आणि भ्रामक कल्पना त्यातून घेतलेले चुकीचे निर्णय, आई वडिलांना न जुमनता स्वतःच भविष्य पणाला लावून शेवटी अतिशय हृदयद्रावक रितीने संपलेली श्रद्धा वालेकर. आजमितीला देशभरात हे प्रकरण पेटलेले आहे. अश्या अनेक श्रद्धा या आधीही खोट्या, फसव्या प्रेमाच्या आहारी जावून बळी गेल्यात तरीही आज सुद्धा अनेक मुली त्याच चुकीच्या वाटेवर जातांना दिसतात.

या लेखामार्फत आजच्या समस्त तरुण मुलींना एकच सांगणं आहे कि आपलं अतिशय सुंदर, छान आयुष्य, आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर, आपलं कुटुंब, आपलं घर, आपले आई वडील, भावंड, नातेवाईक, अत्यंत जवळचे आणि खरे मित्र मैत्रिणी याहून प्रिय आणि महत्वाचे जगात काहीही नाही.

सर्वात महत्वाचे आपलं घर, आपलं गाव आपलं शहर तिथे तुमच्या वर आई वडिलांची सावली आहे, सुरक्षा आहे, संरक्षण आहे, मायेची ऊब आहे तेथून कायमस्वरूपी बाहेर पाय टाकताना थोडा तरी विचार करा.

कोणत्याही मुलीला तरुण वयात, किशोर वयात मुलांना पाहून विशिष्ट भावना, हुरहूर, जवळीक, शारीरिक आकर्षण निर्माण होणे अतिशय नैसर्गिक आहे. पण याला प्रेम, खरं प्रेम समजण्याची गंभीर चूक जेंव्हा मुली करतात आणि कसलाही विचार न करता त्यात वाहवत जातात त्यावेळेस श्रद्धा सारखे प्रकरण घडते.

खरतर अनेकदा संपूर्ण आयुष्य गेलं तरीही खरं प्रेम कोणालाच मिळालेलं नसत, मिळत नसत. खूप कमी उदाहरण अशी असतील जिथे प्रेम विवाह शंभर टक्के यशस्वी झाले असतील, ठरवून केलेल्या लग्नाची पण फारशी वेगळी परिस्थिती नाही. अनेकदा रीतसर केलेली लग्न सुद्धा तडजोड असतात. समाज कुटुंब यांच्या दबावाखाली ती रेटून नेलेली असतात. बाहेरील समाजात सुरु असलेले विवाहबाह्य प्रकरणे, सातत्याने बॉय फ्रेंड्स गर्ल फ्रेंड्स बदलण्याची तरुणांमधील फॅशन, विवाहितांच्या आत्महत्या, घातपात, बलात्कार, विनयभंग, वाढते वेश्या व्यवसाय, छेडछाडीची प्रकरण, महिलांचे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण, एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, मुलींना अश्लीस विडिओ मेसेज यातून ब्लॅकमेल करणे, मुलींची सामाजिक बदनामी होईल असे वर्तन करणे यातून समाज कोणत्या थराला जात आहे याची पूर्ण कल्पना तरुण मुलींना असणे आवश्यक आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला अतिशय अल्लड, अर्धवट वयात भेटलेला मुलगा, जो नौकरी धंद्यात देखील स्थिर नाही, ज्याचं शिक्षण पूर्ण नाही, जो एक रुपया कमवत नाहीये, किंवा सेटल असेल तरी ज्याच्या बाबतीत आपल्याला फारशी इतर माहिती नाहीये असा मुलगा आयुष्याचा जोडीदार म्हणून का निवडला जातोय? त्याच्या सोबत सगळ्या मर्यादा ओलांडून आपण कसे वाहवत जावू शकतो?

जो आपल्यावर प्रेम आहे, आपल्याशिवाय जगू शकणार नाही, आपला दुरावा सहन करू शकणार नाही असली वचने, शपथ, वायदे देतोय, मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे म्हणतोय, मी तुला सोडणार नाही अशी भावनिक वक्तव्य करतोय आणि त्याचवेळी प्रेमाच्या नावाखाली आपल्याला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडतोय, लग्न न करताही आपण एकत्र राहुयात असे पर्याय देतोय ? आपल्याला वेळोवेळी भावनिक करुन आई वडिलांचे घर सोडायला प्रवृत्त करतोय, पळून जावून वेगळं राहू, कोर्टात लग्न करू, शून्यातून जग निर्माण करू असले डायलॉग मारतोय तो खरा प्रेमवीर आहे असं आपल्याला का वाटतं ?

जो मुलगा आपल्याला शाळा कॉलेज चे वर्ग बुडवून फिरायला चल म्हणतोय, आपलं शिक्षण सोडायला सांगतोय, घरातल्याना खोटं सांगून लपून छपून आपल्याला भेट म्हणतोय, स्वतः देखील तेच उद्योग करतोय, जो इकडून तिकडून उधार पैसे मागून आपल्याला गिफ्ट ग्रीटिंग हॉटेलिंग लॉग ड्राईव्ह असले प्रकार फक्त इंप्रेस करायला करतोय तो प्रेम करण्याच्या लायकीचा आहे का, त्याच भविष्य काय हा प्रश्न आपल्याला पडत नाही का?

जो स्वतःची वासना भागवायला आपल्याला कोणत्याही खालच्या दर्जाच्या लॉज वर नेतोय कोणाच्याही खोली वर नेतोय तिथे कधीही काहीही चुकीचं घडू शकते हे माहिती असून पण आपण सोबत असतांना अशी रिस्क घेतोय, आड बाजूला, आडोशाला नेऊन सार्वजनिक ठिकाणी जो आपल्या सोबत शारीरिक चाळे करतोय तो प्रेम करत असतो का ?

लग्न करण्याच्या आधीच आपल्याकडे शारीरिक सुखाची अपेक्षा करणारा, आपल्याला चुकीचे मार्ग दाखवणारा, त्याच्या मित्रांमध्ये आपल्याबद्दल चर्चा करुन आपल्याला बदनाम करणारा, स्वतःच्या मूड आणि गरजेनुसार आपल्याला वापरणारा, वेळी अवेळी आपल्याला कुठेही भेटायला बोलावणारा, कोणत्याही वेळी कुठेही आपल्याला फोन मेसेज करत राहून अडचणीत आणणारा खरं प्रेम करणारा असेल का ??

लग्नाआधीच आपल्याला आपले अश्लील फोटो विडिओ मोबाईल वर पाठवायला सांगून, तसेच विविध वेबसाईट वरील विडिओ फोटो आपल्याला दाखवून आपल्यासोबत त्याची मजा घेणारा विडिओ कॉल मार्फत आपल्याकडून चुकीचं कृत्य करुन घेणारा निस्सीम प्रेम करतोय असं आपल्याला का वाटतं ?

चोवीस तासातले एक दोन अथवा तीन तास जरी तो आपल्यासोबत घालवत असेल तर उरलेल्या वेळेत तो नेमक काय करतोय कुठे असतो, कुठे जातो, कोणासोबत कोणत्या अवस्थेत असतो, व्यसन करतो का, याबद्दल आपल्याला खरी माहिती असते का ?? त्याच्या घरातील लोकांची, मित्रांची, त्याच्या सगळ्या चांगल्या वाईट सवयीची, त्याच्या खऱ्या स्वभावाची, त्याच्या गुण दोषांची आपल्याला काहीही शाश्वत माहिती नसताना फक्त त्याच वरवर च बोलणं आपल्याला प्रेम का वाटतं ?

स्वतःच्या आई वडिलांच हक्काचं घर सोडून, सर्व सुख सोयी, करिअर, चांगल लग्नाचं स्थळ, चांगला मिळू शकणारा नवरा सोडून कोणत्याही मुलासोबत कुठेही मिळेल तिथे भाड्याने घरं घेऊन राहणं, पुढे दोघांनी मिळेल ती नौकरी व्यवसाय करुन पोट भरण, जमलंच तर रजिस्टर लग्न करणं अथवा तसंच एकत्र राहणं या संघर्षांमध्ये आपलं खरं म्हणवणार प्रेम टिकणार आहे का ? बाहेरच्या जगातील ठोकरा लागल्यावर, दररोज आव्हान उभी राहिल्यावर, राहणीमान, कपडे खाणे पिणे याचा दर्जा घसरल्यावर, एकमेकांच्या सवयी खटकू लागल्यावर आपलं स्वप्नातल प्रेम तग धरू शकणार आहे का? हा विचार मुलींनी करावा.

हे सगळं प्रेमाखातर सहन करुन, बिकट परिस्थिती मध्ये सुद्धा आपलं सर्वस्व पणाला लावून, आपल्या सर्व सुखाचा त्याग करून अश्या मुलासोबत आयुष्य काढत असतांना जेव्हा तो आपल्याला शिवीगाळ, मारहाण करायला लागतो, व्यसनाधीन होतो, त्याच खरं रूप दाखवायला लागतो, आपल्यावर अत्याचार करायला लागतो त्याला आपण नकोसे व्हायला लागतो तरी पण आपले डोळे उघडत नाहीत का? त्यावेळी देखील आपलं आंधळं प्रेम आपल्याला त्याच्या विरुद्ध कोणतंही कठोर पाऊल उचलू देत नाही, कारवाई करू देत नाही. परत परत चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन आपण किती दूर निघून आलोय याची जाणीव पण आपल्याला होऊ नये का? हे सगळं सहन करत असतांना पण आपल्याला जन्मदात्या आई वडिलांना संपर्क साधावा, त्यांची मदत मागावी इतकी माघार अथवा कमीपणा घ्यायला लाज का वाटावी? ऐका अश्या मुलासाठी सर्वांशी संबंध तोडून बसल्यावर दुःख, त्रास सांगायला कोणीच जवळच हक्काचं उरत नाही इतकी प्रेमाची धुंदी आपल्यावर का चढते? स्वतः शारीरिक, मानसिक, भावनिक नुकसान होऊन पण मुलींना माघारी फिरावस का वाटतं नाही

खोटे बोलून ज्यानं आपल्याला फसवलं, विश्वासघात केला, आपल्या प्रेमाचा गैरफायदा घेतला, ज्याच्या दुष्ट, विकृत, त्रासदायक वागणुकीमुळे आपलं आयुष्य उध्वस्त झालं, ज्याच्या निष्काळजी आणि बेजबाबदार वर्तवणुकीमुळे आपल्याला वाईट दिवस आलेत त्याच्याच सोबत परत परत राहण्याचा अट्टाहास का आणि कशासाठी? ज्याच्यामुळे आई बाप दुरावले, जवळचे सगळे लांब झाले तरीही असं नातं टिकवण्याची मुलींची धडपड, तो सुधरेल, बदलेल ही दुबळी आशा, आपलं प्रेम, आपली ओढ त्याला बदलायला भाग पाडेल हा मूर्खपणा चा कहर आणि यातूनच एकदिवस जीवनाचा अंत झालेली सुशिक्षित सुसंस्कृत चांगल्या घरातील मुलगी हे विदारक सत्य आज समाजात पाहायला मिळते आहे.

मुलींनो हे बदला, स्वतःला बदला, स्वतःच्या स्वप्नांना बदला, विचारांना बदला, आपला दृष्टीकोन बदला.

आपलं आयुष्य इतकं स्वस्त आणि किरकोळ नक्कीच नाही, कोणत्याही कसायाच्या हातून आपण मरावं यासाठी आपल्याला पालकांनी जन्म दिलेला नाही. आपल्या आईवडिलांनी आपला असा विदारक अंत पाहावा इतके दुर्दैवी त्यांना बनवू नका. सर्व तरुण मुलींनी स्वतःला हे सर्व प्रश्न विचारा आणि वेळेत स्वतःला सावरा. प्रेमाच्या नावाखाली स्वतःची इज्जत स्वतःचा जीव गमावून बसू नका.


Post a Comment

Previous Post Next Post