वाघाचा गाईवर हल्ला


कुरखेडा :- तालुक्यातील आंधळी नवरगाव येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने हल्ला चढविल्याचे प्रत्यक्षदर्शी गावातील नागरिकांनी बघितले असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील खरमतटोला, अरततोंडी व आंधळी - नवरगाव गावा नजिक संपूर्ण आजूबाजूचा परिसर जंगल व्याप्त असल्याने वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. आंधळी- नवरगाव शेतकरी येथील प्रकाश कवाडकर हे नेहमीप्रमाणे पशुंना गोठ्यात बांधून रात्रीच्या सुमारास झोपी गेले होते. अशातच दरम्यान जंगलातून वाघाने थेट गावात प्रवेश करीत कवाडकर यांच्या गोठ्याच्या दिशेने मोर्चा वळविला. यावेळी वाघाने बांधलेल्या अवस्थेत असलेल्या गायीवर हल्ला चढविला. मात्र वाघापेक्षा मोठी असलेल्या गायीने प्रतिकार केला.दरम्यान घराशेजारच्या नागरिकांना याची चाहूल लागताच कवाडकर यांच्या गोठ्याकडे बघितले असताना वाघ व गायींमध्ये संघर्ष सुरू असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी व पशुपालक कवाडकर यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला.

गावातील नागरिकांच्या मते, काही दिवसांपासून वाघ गावामध्ये येत असल्याने जनावरांसह गावातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्याकरिता वन विभागाने वन्य जीव व मानवी संघर्ष टाळण्याकरिता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post