भाजपामधील भ्रष्ट नेत्यांवर कारवाई का नाही? विरोधकांचा प्रधानमंत्री मोदींना एकजुटीने सवाल





नवी दिल्ली: देशातील विरोधी पक्षातील ९ बड्या नेत्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. सीबीआय आणि ईडीचा विरोधकांविरोधात वापर होत असल्याचे सांगतानाच या पत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजपामधील भ्रष्ट नेत्यांवर कारवाई का नाही? असा विरोधकांनी मोदींना एकजुटीने सवाल केला आहे.



राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ प्रमुख नेत्यांनी या पत्रावर सही केली आहे. त्यामुळे या पत्रावर भाजपकडून कसं उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर या पत्रातून आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यावरतीही टीका करण्यात आलीय. 



विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. तपास यंत्रणांचा सिसेमिरा त्यांच्या मागे लावला जात आहे. मात्र, हेच नेते जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांच्याविरोधात सुरू असलेली चौकशी थांबवली जाते. त्यांना क्लीनचिट मिळते, असं या पत्रातून सांगण्यात आलं आहे.



तर याच पत्रातून राज्यपालांची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या कामात राज्यपाल हस्तक्षेप करत आहेत. केंद्र आणि राज्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्याला कारण राज्यपाल असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगितलं आहे.



दरम्यान या पत्रावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव, टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post