अकोला : लग्नाआधीच भावी जावयाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आलीय. याबाबत मुलीच्या आईने अकोट फैल पोलिस ठाण्यात भावी जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांचाही शोध सुरु केला आहे.
नेमकी घटना काय?
काही दिवसांपूर्वी अकोट फैल भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेच्या मुलीचा अमरावती येथील एका तरुणासोबत साखरपुडा झाला होता. मात्र, मुलीचे वय कमी असल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न करण्याचे ठरवले. साखरपुडा झाला असल्याने या तरुणाचे तक्रारदार महिलेच्या मुलीसोबत फोनवर नियमित बोलणे व्हायचे
दरम्यान, मुलीला बरे वाटत नसल्याने अमरावती येथील भावी जावई २५ मार्च रोजी मुलीला भेटण्यासाठी अकोट फैल येथे तिच्या घरी आला. जावई म्हणून सासूनेही आदरातिथ्य केले. सासूला काही काम असल्यामुळे ती बाहेर निघून गेली. घरी परतल्यावर भावी जावई आणि मुलगी दिसून आली नाही.
दोघेही बाहेर गेले असतील असा अंदाज तक्रारदार महिलेने बांधला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोघेही परतले नाहीत. मुलीचा साखरपुडा झालेला असल्यामुळे या महिलेने सुरूवातीला याप्रकरणात पोलिसांकडे तक्रार दिली नाही. मात्र, बराच वेळ होऊनही मुलगी आणि भावी जावई घरी परत न आल्याने मुलीच्या आईला चिंता वाटू लागली.
तक्रारदार महिलेने मुलगी आणि भावी जावई दोघांनाही फोन केले. मात्र, त्यांचे फोन बंद येत होते. अखेर मुलीच्या आईने अकोट फैल पोलिस ठाण्यत जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली.
Tags:
akola