🗳️ एकदा निवडणूक जाहीर झाली की आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेच्या अंतर्गत काही नियम ठरवले जातात आणि ते सर्व नियम हे संबंधित राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पाळावे लागतात. निवडणूक आचारसंहिता निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर लगेच लागू होते आणि निवडणुका संपेपर्यंत सुरू राहते. तर आज जाणून घेऊयात आचारसंहिते संदर्भात सविस्तर माहिती.
🔰 *आचारसंहिता कधीपासून लागू होते?*
निवडणूक आयोगाकडून कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली जाते. त्यावेळी तारखा जाहीर करताच तात्काळ परिणामाने आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती कायम राहते.
🔰 *कोणत्या भागात आचारसंहिता लागू केली जाते?*
लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू केली जाते.
🔰 *पहिली आचारसंहिता कुठे लागू केली गेली?*
देशात पहिली आचारसंहिता ही 1960 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीदरम्यान लागू करण्यात आली. तर 1962 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा सर्व देशभरात त्यामध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांना कोणत्या गोष्टींचे पालन करावे लागेल याची नियमावली होती.
🔰 *आदर्श आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?*
आदर्श आचारसंहितेमध्ये प्रामुख्याने राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक प्रचार, सभा, मिरवणुकांचे नियोजन कसं करावं, त्यासाठी काय नियम आहेत याचा एक आराखडा आचारसंहितेत नमूद असतो.
🔰 *पक्ष आणि उमेदवारांसाठी मुख्य मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?*
निवडणूक प्रचारादरम्यान कोणताही पक्ष किंवा उमेदवाराने समाजात द्वेष पसरेल, किंवा त्याच्या वक्तव्यामुळे समाजातील विविध जाती आणि समूदायांमध्ये धार्मिक किंवा भाषिक तेढ निर्माण होईल अशी कृती करू नये.