नाशिक, :- महाराष्ट्रात आजही जात पंचायत अस्तित्वात असून अन्यायकारक निवाडा सुरूच आहे. जात पंचायतीने फोन करून घटस्फोटाचा निर्णय मान्य करत सासरच्यांनी केवळ एक रुपया भरपाई देण्याचा निवाडा सिन्नर येथे देण्यात आला आहे. त्यामुळे कायद्यापेक्षा जात पंचायत वरचढ ठरत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच कायदा बासनात बांधून आजही जात पंचायती भरविल्या जात असल्याचे सिद्ध झाले आहे. सिन्नर येथील अश्विनी या महिलेचे लोणी (नगर) येथे लग्न झाले होते. लग्नानंतरसासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केल्याने ती माहेरी सिन्नर येथे आली. याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी व सिन्नर येथे वैदू समाजाची जातपंचायत बसविली. जातपंचायतीने या महिलेला न विचारता तिच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फोट केला. त्यासाठी सासरकडील लोकांनी भरपाई केवळ एक रुपया पंचांकडे दिला.
आठ दिवसातच दुसरी लगीनगाठ
आठ दिवसापूर्वीच विवाहितेच्या पतीने दुसरे लग्न केले. पतीचा हा निर्णय पीडितेला असहा झाला. त्यामुळे तिने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे न्यायालयात दाद मागणे अवघड गेले. शिवाय जात पंचायतीने विवाहितेला पोलिस ठाण्यात जाण्यापासून रोखले.
Tags:
नाशिक