महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद येथे उघडकीला आलेली असून एका व्यक्तीने ओळखीच्या एका महिलेच्या पतीला फोन करून बोलावून घेतले आणि त्यानंतर ‘ मला तुझ्या पत्नीसोबत लग्न करायचे आहे ‘, असे म्हणून त्याला एका ठिकाणी डांबले. त्याने डांबलेल्या व्यक्तीच्या पत्नीला फोन करून ‘ आताच्या आता भेटायला ये नाहीतर तुझ्या पतीला मारून टाकील,’ अशी धमकी दिली त्यानंतर ही महिला माहेराहून पुन्हा पतीसाठी शहरात आली आणि सातारा पोलिसांच्या मदतीने तिने पतीची सुटका करून घेतली. मंगळवारी हा प्रकार उघडकीला आला असून परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दत्ता नाथाप्रसाद पवार ( वय 23 पांगरकर नगर जालना ) असे आरोपीचे नाव असून त्याला सातारा पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत . आरोपी दत्ता याची एका महिलेसोबत फार पूर्वीपासून ओळख होती. सदर प्रकाराची कुणकुण या महिलेच्या पतीला लागल्यानंतर त्याने पत्नीचा मोबाईल काढून घेतला आणि तिला माहेरी पाठवून दिले त्यामुळे संपर्क होत नसल्याने दत्ता हा अस्वस्थ झाला होता.
सदर महिलेला भेटण्यासाठी दत्ता याने एक प्लान बनवला आणि त्यानुसार महिलेच्या पतीला फोन करून, ‘ तुमच्या बायकोबद्दल मला जरा महत्त्वाचे बोलायचे आहे. तुम्ही मला भेटा आपण चहा घेऊ , ‘ असे सांगत बोलावून घेतले त्यानंतर त्याने महिलेच्या पतीला एका घरात घेऊन जात कुलुप उघडून आतमध्ये डांबले आणि महिलेच्या पतीकडून मोबाईल आणि दुचाकी हिसकावून घेतली.
दत्ता याने त्यानंतर महिलेच्या पतीच्या मोबाईलवरून तिच्या माहेरी फोन करून, ‘ आताच्या आत्ता जर तू मला भेटायला आली नाही तर तुझ्या नवऱ्याला कटरने कापून टाकीन, ‘ अशी धमकी दिली. त्यानंतर महिला घाबरून गेली आणि तिने तात्काळ औरंगाबाद इथे दाखल होत सातारा पोलिसांची मदत घेत मंगळवारी साडे पाच वाजता पतीची सुटका केली. सदर प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाठ हे करत आहेत.
Tags:
औरंगाबाद