तुमसर:- तलावातून मासे पकडून कोल्हापुरी बंधाऱ्यावरून चालत घरी येत असताना मेघगर्जनासह पाऊस सुरू होऊन लगतच्या बेलाच्या झाडावर वीज कोसळली. त्या विजेचा धक्का लागल्याने साळा भाटवा नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेले. ही घटना तालुक्यातील हिरापूर हमेशा येथे घडली. दिनेश हिरदीराम खुने (48), रा. पुलपुट्टा, ता. कटंगी, जि. बालाघाट (म.प्र.), बुधराम हगरु हांडके (47), रा. हिरापूर हमेशा, ता. तुमसर, जि. भंडारा अशी मृतांची नावे आहेत.
घटनेच्या दिवशी दिनेश खुणे हा आपल्या बहिणीच्या घरी हिरापूर हमेशा येथे हांडके यांच्याकडे आला होता. दोघेही साळे-भाटवे गावातील हमेशा तलावाच्या नहरावरून मासोळी पकडल्यानंतर सायं. 6 वाजताच्या सुमारास कोल्हापुरी बंधाऱ्यावरून घरी येत होते. दरम्यान, मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आणि बंधाऱ्यालगत असलेल्या बेलाच्या झाडावर वीज कोसळली. त्यांना विजेचा धक्का लागल्याने दोघेही नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेले. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी परत न आल्याने नहर परिसरात त्यांचा शोध सुरू होता. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. गोबरवाही पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
Tags:
तुमसर