नागपूर:- देशभरात बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची लाट आली आहे. या वर्षीच्या धम्मचक्र प्रवर्तनदिनी दिल्लीसह गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थानात मोठ्या प्रमाणात धर्मांतर कार्यक्रम झाले. त्याला घाबरून रा. स्व. संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी इतिहासात घडलेल्या चुकांकरिता ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचे वक्तव्य केले आहे, अशी टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज सोमवारी येथे केले. यावेळी त्यांनी दीक्षाभूमीवरील स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांच्यावर संघाच्या आहारी गेल्याचा आरोप करून २०२४ मध्ये आंबेडकर घराण्याची लोकप्रियता दिसून येणार असल्याचे सांगितले. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर मनुवाद्यांचे 'दास' असल्याचा जोरदार हल्ला चढविला. आठवले राजकारणातील जोकर आहेत. त्यांना काही इभ्रत नाही. बाबासाहेबांच्या महान धम्मक्रांतीची टिंगल टवाळी करतात. त्याचा जाहीर निषेध करतो. दीक्षाभूमीवर कुणी 'झेले' आहेत. ते मनुवाद्यांच्या कळपात गेले आहेत. दीक्षाभूमीला मनुवाद्यांच्या कळपातून मुक्त करणार, अशी घोषणादेखील त्यांनी यावेळी केली. गरज पडल्यास २०२४ , मध्ये नागपूरमधून निवडणूक लढविणार, असे त्यांनी सांगितले.
Tags:
नागपुर