देसाईगंज येथील त्या हत्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

देसाईगंज : शहरातील आंबेडकर वार्डमधील रहिवासी आशिष रवी मेश्राम (२४ वर्ष ) या युवकाची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकण्याच्या घटनेतील मुख्य आरोपीला अवघ्या २४ तासात पकडण्यात पोलिसांना यश आले. या खुनात त्याला सहकार्य करणारे इतर साथीदारही लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मृतक आणि मुख्य आरोपी यांच्यात आठवडाभरापूर्वी वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

आशिष हा मंगळवारच्या रात्री ८ वाजता अचानक घराबाहेर पडला होता. त्यानंतर काही वेळातच त्याची हत्या झाल्याचा अंदाज आहे. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह भगतसिंग वार्ड ते तुकुम वार्ड लगत असलेल्या कालव्यात सापडला होता. अंगावरील जखमा आणि शवपरीक्षण अहवालावरून देसाईगंज पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान पोलिसांनी घेतलेल्या कानोसानुसार विशाल रामभाऊ रेखडे ( २४ वर्ष) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत त्याच्याकडून या घटनेची पार्श्वभूमी आणि मदत करणाऱ्यांची नावे पुढे येऊ शकते


आठवडाभरापूर्वी झाला होता वाद

मृत आशिष मेश्राम आणि आरोपी विशाल रेखडे यांच्यात जुना वाद होता. आशिष याने विशाल याला १० दिवसांपूर्वी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तोच राग मनात ठेवून विशालने आशिषला भगतसिंग वार्ड ते तुकूम वार्डच्या कालव्याकडे कोणत्या निमित्ताने बोलवून तिथे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याचा गेम केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात झाल्याचे दाखविण्यासाठी त्याचा मृतदेह आणि दुचाकी नाल्याजवळ फेकून दिली.


Post a Comment

Previous Post Next Post