माझ्या नवऱ्यासोबत लफडा करतेस म्हणुन दोन सख्ख्या बहिणींनी केली महिलेची हत्या


मुंबई - : काही दिवसांपूर्वी मुंबईत एका पोत्यात महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ना कोणता पुरावा सापडला, ना साक्षीदार. हे रहस्य उलगडणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं होते. परंतु अचानक एक व्यक्ती पोलिसांकडे पोहचतो त्यानंतर या मर्डर मिस्ट्रीचा खुलासा झाला..

मुंबईच्या नेहरू नगर परिसरात नाल्यात एक पोतं पडलं होते. सुरुवातीला लोकांचे लक्ष त्याकडे गेले नाही. परंतु त्या पोत्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे लोक त्रस्त झाले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोतं पाहिले असता त्यात एखादी वस्तू दाबून बसवली असून त्यानंतर ती बांधण्यात आल्याचं दिसलं. घटनास्थळी पोलिसांनी नाल्यातून हे पोतं बाहेर काढले आणि उघडले असता पोलिसांसह आसपासच्या लोकांना मोठा धक्का बसला. या पोत्यात महिलेचा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत सापडला होता.

इतकी गर्दी असणाऱ्या या परिसरात मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकला कुणी? गुन्हेगारानं पुरावे मिटवण्यासाठी नेहरू नगरचा नाला का निवडला? गुन्हेगार याच परिसरात राहणारा होता? की दुसऱ्या परिसरातून येऊन त्याने हे पोतं फेकून निघून गेला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधायची होती. पोलिसांनी मृतदेह राजावाडी हॉस्पिटलला पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर अज्ञाताविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी ४ पथके बनवली. तपासाला सुरुवात झाली.


पोलिसांनी खबरी, दुकानदार, रिक्षाचालक यांची चौकशी सुरू केली. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर पोलिसांसमोर स्वतः प्रत्यक्षदर्शी हजर झाला. मृतदेह सापडल्यानंतर तपासाला सुरुवात केली आणि एक रिक्षाचालक पोलिसांसमोर पोहचला. त्याने असा खुलासा केला की पोलिसही हादरले. १ ऑक्टोबरच्या रात्री २-३ दरम्यान हे पोतं नाल्यात फेकलं. रिक्षात बसलेल्या २ महिलांनी हे पोतं नाल्यात फेकले. ज्यारात्री ही घटना घडली तेव्हा त्या माझ्याच रिक्षात बसल्या..

या प्रकरणाचा छडा लवकर लागेल असं पोलिसांना वाटलं. परंतु प्रत्यक्षदर्शी उघडपणे समोर बोलण्यास घाबरत होता. जर काही सांगितले तर त्या खूनी महिलांचा शिकार आपण होऊ अशी भीती त्याच्या मनात होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला सुरक्षा देण्याबाबत भरवसा दिला. त्यानंतर त्याने पोलिसांना जे सत्य सांगितले त्याने धक्काच बसला. रात्रीच्या २ वाजता नेहरू नगर बसस्टँडवरून २ महिलांनी रिक्षा भाड्याने घेतली. माहूलजवळ पोहचताच महिलांनी रिक्षा १० मिनिटं थांबवण्यास सांगितली. त्यातील १ महिला घरात गेली. त्यानंतर काहीवेळाने १ पोतं घेऊन ती परतली. महिलांनी पुन्हा नेहरू नगरला नेण्यास सांगितले. त्यानंतर नेहरू नगरच्या नाल्याजवळ उतरून मला जाण्यास सांगितले. त्यानंतर पुढे काय झाले हे माहिती नाही असं त्याने पोलिसांना म्हटलं.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात २ महिला पोतं घेऊन जाताना दिसल्या. रिक्षाचालकाकडून पोलिसांनी त्या महिलांची ओळख पटवून घेतली. पोलिसांनी महिलेचा तपास सुरू केला तेव्हा या महिला बहिणी असल्याचं कळालं. मीनल पवार आणि शिल्पा पवार, त्यानंतर दोघींना अटक केली तेव्हा दोघांना खाकीचा हिसका दाखवताच गुन्हा कबूल केला.

मीनल पवारच्या नवऱ्याचे ईशा मिस्त्री नावाच्या महिलेशी संबंध होते. मीनल आणि पतीचे ईशावरून नेहमी भांडणं व्हायची. परंतु ईशासोबत नाते संपवण्यास पती तयार नव्हता. दोघांची जवळीक वाढतच चालली होती. त्यावरून मीनल आणि तिची बहीण शिल्पा दोघी वैतागल्या होत्या. १ ऑक्टोबरच्या रात्री मीनलचा पती ईशासोबत तिच्या एका डॉली नावाच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. डॉली ही मीनलची फॅमिली फ्रेंड होती. डॉलीने मीनलला फोन करून ईशा आणि तिच्या पतीबद्दल सांगितले. मीनलचा पती ईशाला डॉलीच्या घरी सोडून निघून गेला तेव्हा डॉलीने मीनलला कळवले. त्यानंतर शिल्पासोबत मीनलसोबत तिथे पोहचली आणि तिघांनी मिळून त्या रात्री ईशाचा गळा आवळून खून केला.


Post a Comment

Previous Post Next Post