आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली,
माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .
तलाठ्यानं सांगितलं -
"काम करू पण,
देणार किती ?"
मला वाटलं शेती आमची,
बाप माझा,
आजा माझा.
मग याला का पैसे द्यायचे ?
तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.
पोलीस म्हणाले -
"गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .
आमच्या चहा पाण्याचं काय ?"
मला पुन्हा राग आला.
यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.
म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,
आमदार म्हटले . . .
"त्याची गडचिरोलीला बदली करू,
त्याला निलंबित करू,
मंत्र्यांना भेटू पण . . .
वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही..."
मला वाईट वाटलं.
यांना तर मीच मतदान केलं होतं.
वाटलं कोर्टात जाऊ . . .
गेलो.
तिथं गेल्यावर कळलं की,
तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हातारी आली आहे.
तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.
अजून निकाल लागला नव्हता.
शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती.
म्हटलं हे एखाद्या . . .
पत्रकार,
लेखकाला सांगावं . . .
मन हलकं करावं ! आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.
तिकडे गेलो
तर सगळेच म्हणाले,
"पेन आमच्या हातात असला तरी,
त्यातली शाई आम्ही विकली आहे.
आम्ही तसं लिहू शकत नाही.
आमचे हात अन . . .
पेन बांधलेले आहेत."
मला याचा प्रचंड राग आला होता.
म्हणून एका साधू बाबा कडे गेलो.
वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.
मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .
"उद्या या !
सध्या बाबा महाराज ,
P I साहेब,
आमदार साहेब,
पत्रकार साहेब,
लेखक, आले आहेत.
बाबा महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत,
नंतर . . .त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत.
आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत."
माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.
म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ ...!
लोकांसमोर गेलो,
लोकांना हे सांगितलं.
लोकं म्हटली
"हा येडा झालाय् . . . . .
हल्ली काही बरळतोय् !"
नंतर कळलं . . .
लोकं गुलाम झाली आहेत !
लाचार झाली आहेत !
क्षणभर वाईट वाटलं.
मी करणार तरी काय होतो.
त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?
कि मारावं? यांना . . .
😢 😢
मी एक मतदार !
( या देशाचा मालक ? )
कटू, पण सत्य परिस्थिती...
🙏🙏🙏🙏
Tags:
कविता