मला मित्र नाहीत, ते नसल्याने मी आनंदी नाही. त्यामुळे जीवनाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे,


नागपूर : ‘मला मित्र नाहीत, ते नसल्याने मी आनंदी नाही. त्यामुळे जीवनाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे,’ अशी चिठ्ठी लिहून विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सानिका प्रवीण लाजुरकर (१८, शिव हाईट्स, पृथ्वीराजनगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजता उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण लाजुरकर हे वर्धा येथील एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. तर आई एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. त्यांना सानिकासह दोन मुली आहे. सानिका ही नागपुरातील घरी राहते तर पती-पत्नी आणि लहान मुलगी वर्धेत राहतात. सानिका ही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी तयारी करीत होती. ती शिकवणी वर्गाला जात होती. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात वावरत होती. मित्र नसल्यामुळे तिला खंत वाटत होती. त्यामुळे तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिकवणी वर्गातील शिक्षकांनी तिच्या पालकांना फोन करून सानिका अनुपस्थित असल्याची माहिती दिली. त्यामुळे तिच्या वडिलांनी नागपूर गाठले. घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आली. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Post a Comment

Previous Post Next Post