अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे हा गुन्हा आहे का



‘अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे हा गुन्हा आहे का?’
भारतामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे आणि हल्लीचे वातावरण बघितले धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही दोन्ही शब्दाला डावलून द्वेषाचे राजकारण करून दोन समाजामध्ये दुफळी निर्माण करून देशाला विकण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे भारतीय संविधानाचे नाव न घेता संविधान संपुष्टात आणले जात आहे
भारतामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे आणि हल्लीचे वातावरण बघितले धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही दोन्ही शब्दाला डावलून द्वेषाचे राजकारण करून दोन समाजामध्ये दुफळी निर्माण करून देशाला विकण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे भारतीय संविधानाचे नाव न घेता संविधान संपुष्टात आणले जात आहे. ज्या महापुरुषांनी येथील विषमतावादी, अंधविश्‍वासू, पाखंडी, कर्मकांड करणारी व्यवस्था नाकारून देशाला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांमध्ये गुंफून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. हा अधिकार देताना त्यांना येथील कर्मठ, ढोंगी, पाखंडी, निच मानसिकतेच्या लोकांचा विरोध झाला तरीही कोणत्याही अडचणी यांना न घाबरता, न डगमगता त्यांनी माणसाला माणूस म्हणून वागण्याचे व माणसाचे जीवन स्वाभिमानाने जगण्याचे प्रयत्न यशस्वी करून दाखवले. ते महापुरुष आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत. आता आपण मुख्य मुद्यावर येऊ.


मागील एका महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत अवमानाची मालिकाच सुरू आहे. एखाद्याने बोलले असते तर समजून घेतले असते चुकीने झाले असेल त्याला माफही केले असते. परंतु येथे महापुरुषांचा अवमान मुद्दामहून केला जात आहे. कारण अवमान करणारे सर्व भाजप या एकाच पक्षाचे आहेत. बरं या लोकांनी जेव्हा केव्हा छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांचा अवमान झाला तेव्हा पक्षातील कोणताही नेत्यांनी त्यांची चुक कबूल केली नाही. बरं यांना इतिहास माहिती नाही तर हे इतिहासावर बोलतातच कशाला? तर आज हे जाणीवपूवर्वक घडवून आणले जाते, लोकांना भडकवले जाते. लोक भडकले की त्यांच्या हातून चुकीचे काम होते आणि चुकीचे काम झाले की तरुणांवर केसेस दाखल केल्या जातात. केसेस झाल्या की तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होते.



सामाजिक कार्यात येण्याचे आणि अन्याया विरोधात आवाज उठवण्याचे कुणाचे धाडस होत नाही. थोडक्यात सामाजिक आंदोलन, सामाजिक आवाज दाबण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? अशी शंका निर्माण होते. भगतसिंह कोश्यारी असतील, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी, गोपीचंद पडळकर, रावसाहेब दानवे आणि आता चंद्रकांत पाटील. यांनी जेव्हा जेव्हा महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य केले, जनतेचा आवाज मोठा झाला तरीही यापैकी काहींनी साधी माफी सुद्धा मागितली नाही अथवा पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्यांना समज देखील दिली नाही की महापुरुषांचा इतिहास माहिती नसेल तर बोलू नका. 



उलटपक्षी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पाठीशी घालून वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि अनवधानाने काही शब्द बोलले गेले असतील पण त्याचा चुकीचा अर्थ काढून दिशाभूल केली जात आहे अशा प्रतिक्रिया पक्षांच्या नेत्यांनी दिल्या. काही नेत्यांना विचारले ज्यांनी चुकीचे वक्तव्य केले त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल तर हे नेते लोकप्रतिनिधी बोललेत आम्ही तुमची अडचण मुख्यमंत्र्यापर्यंत पाठवू. मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली याची माहिती प्रसार माध्यमांनासुद्धा नाही. पक्षातील एका नेत्याला बोलता येत नसेल, दोन नेत्यांना बोलता येत नसेल मान्य करू, परंपरा येथे न बोलता येणार्‍याची फौजच आहे. एक बोलला तर त्याचे समजू शकतो चुकीच्या पद्धतीने दाखवले जाईल पण येथे भाजपचे नेते दररोज नवीन काही ना काही बोलतच असतात. अहो बोलता येत नाही इतिहास माहिती नाही तर गप्प बसा ना बोलून अज्ञानाचा दुष्काळ तरी दाखवू नका.


 आपण चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर येऊ. महापुरुषांचा अवमान झाला तेव्हा एकही शब्द न बोलणारे, निषेध न करणारे, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली तर खूप आक्रमक झाले. सर्व प्रथम मी हे स्पष्ट करतो की कोणताही चुकीच्या कृत्याचे, वक्तव्याचे मी समर्थन करत नाही, शाईफेक चुकीची असेल तर मी निषेध करतो. परंतु त्या तरुणाने शाई का फेकली याचा विचार करणेसुद्धा आवश्यक आहे. चंद्रकांत पाटील पैठणमध्ये म्हणतात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुद्धा शाळा सुरू केल्या परंतु त्यांनी शासकीय अनुदान घेतले नाही तर शाळेसाठी भीक मागितली. 



मुद्दा क्रमांक एक महापुरुषांनी भीक मागितली एवढे बोलूनसुद्धा ते म्हणतात अवमान झालाच नाही. भीक याचा अर्थ दान आणि आजच्या भाषेत सीएस आर असे स्पष्टीकरण देऊन चंद्रकांत पाटील हसतात. या हसण्याचा काय अर्थ काय आहे? एखाद्या महापुरुषाबद्दल चुकीचे बोलायचे मग त्यावर स्वतःच न्यायाधीश बनून स्पष्टीकरण द्यायचे आणि मग पुन्हा हसायचे. या हसण्याचा अर्थ हा द्वेष नाही तर काय आहे? मुद्दा क्रमांक दोन चंद्रकांत पाटील यांनी भीक या शब्दाचा उच्चार करताना खांद्यावरचा रुमाल समोर करून पसरवला. चंद्रकांत पाटील रुमाल समोर करून पसरवणे हे कशाचे प्रतिक आहे सांगा बरं? 



चंद्रकांत पाटील आणि त्यांचे समर्थन करणारे सर्वांनी प्रामाणिकपणे एकच काम करायचे. चंद्रकांत पाटील यांचा रुमाल समोर करून पसरवलेला फोटो वापरा मग तुम्हाला कळेल चंद्रकांत पाटील यांचा बोलण्याचा उद्देश काय होता. रुमाल पसरवणे भीक मागण्याचे प्रतिक आहे याची हे चंद्रकांत पाटील यांना माहिती नव्हते का मुद्दामहून हे करत आहेत. जर चुकून झाले असते तर त्यांनी सांगितले असते चुकून झाले माफ करा पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली ती ही स्पष्टीकरण देऊन. 



दिलगिरी व्यक्त केली पण महापुरुषांचा अवमान झाला हे त्यांनी कबूल केले नाही. जर महापुरुषांचा अवमान होतो आणि तो मान्य करण्याऐवजी त्यावर पुन्हा हसले जाते. याला द्वेष आणि जाणीवपूर्वक केले नाही तर काय म्हणावे? जर महापुरुषांचा अवमान झाला आणि त्याचा निषेध करणे, आवाज उठवणे गुन्हा आहे का? जर अन्यायाविरुध्द आवाज उठवणे गुन्हा असेल तर अन्याय करणारा गुन्हेगार नाही का? यावर सुद्धा चर्चा होणे आवश्यक आहे.


मी अगोदरच स्पष्ट केले शाई फेकणे चुकीचे असेल तर मी त्याचा निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याची पद्धत त्यात केलेले हातवारे बघून त्यांना भीकच बोलायचे होते हे तर स्पष्ट दिसते. जर भीक शब्दाचा उच्चार करायचा होता आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे होते तर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाऐवजी दुसरे कोणाचे नाव घेता आले नसते का? या व्यतिरिक्त इतर लोकांनी शिक्षण संस्था सुरू केल्या नाहीत का? वरील महाषुरुषांचेच नाव का घेतले? 



बरं यावर पडदा टाकताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हे असे बोलले की एखादा शब्द चुकल्याने आशय बदलत नाही, आशय लक्षात घेतला पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांचे अगदी बरोबर आहे आशय लक्षात घेतला पाहिजे. मग फडणवीस, आपणही जर आशय लक्षात घेतला असता तर फक्त वस्तू बदलली म्हणून आशय बदलता येत नाही. शाई ऐवजी आपण फुलं समजले असते तर त्यांचे स्वागत करण्यासाठी तेथे मंडळी उभे होते असे लक्षात आले असते. पण तुम्ही फक्त शब्द बदलून आशय स्पष्ट करू शकत नाही, मग वस्तू बदलून पण आशय स्पष्ट करायला काय हरकत? 



दुसरे म्हणजे शाई फेकली तर तुम्ही आक्रमक झालात. पण एका महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महापुरुषांबद्दल अपशब्द बोललेजात आहेत आणि आपण तेव्हा आक्रमक झाले नाही उलट तसे काही घडलेच नाही असे सांगत बसला. मग चंद्रकांत पाटील यांच्या बद्दलसुद्धा तुम्ही बोलू शकत होते. संबंधित तरुणांचा उद्देश हा शाई फेकण्याचा नसून तो तरुण सही घेण्यासाठी आला होता, परंतु गर्दीमध्ये पेनाला धक्का लागला म्हणून शाई उडाली असेल, असे बोलले असते तर आम्हाला आदर निर्माण झाला असता. परंतु तुम्ही तसे न बोलता शाई फेकणार्‍या तरुणांवर खोटे नाटे कलम लावून त्यांना गुन्हेगार बनवत असाल तर बलात्काराची शिक्षा कमी करणार्‍या सरकारविषयी व शिक्षा कमी करून आलेल्या बलात्कारी व्यक्तीला कोणी संस्कारक्षम व्यक्ती म्हणेल तर आपली काय प्रतिक्रिया राहील हे आपण स्पष्ट केलेच नाही. 



बलात्कारी व्यक्तीला संस्कारमय व्यक्ती म्हणून त्याचा सत्कार केला जातो तेही तुमच्याच भाजप या जातीयवादी पक्षाचे लोक. महापुरुषांचा अवमान करणारे तुमच्याच पक्षाचे लोक. महापुरुष हे भारतीय लोकांसाठी अस्मितेचे प्रतिक आहे त्यांच्या अस्मितेला कोणी हात लावेल तर ते शांत कसे बसणार? त्यांच्यावर फडणवीस, तुमचे नेते इतिहासाची मोडतोड करून अवमान करून अन्याय करतील. आणि या अन्याया विरोधात कुणी आवाज उठवला तर त्यांना गुन्हेगार म्हणून गुन्हे दाखल करणे योग्य आहे का? 



महाराष्ट्रात जेव्हा केव्हा अन्याय अत्याचार होतील तेव्हा जनतेचा आवाज मोठा होणारच. सामाजिक लोकांवर केसेस दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण जर राजकीय नेत्यांच्या तोंड बंद केली तर किमान डोक्यात असलेली द्वेषाची घाण ओठावर येणार नाही. जर ओठावर आली नाही तर गोरगरीब तरुण आक्रमक होणार नाहीत आणि त्यांचे भविष्य खराब होणार नाही याची काळजी फडणवीस यांनी आपण गृहमंत्री या नात्याने घ्यावी. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा गुन्हेगार नसतो याची नैतिक जाणीव असावी.

विनोद पंजाबराव सदावर्ते
मोबा. ९१३०९७९३००

Post a Comment

Previous Post Next Post