पोटात मद्याचे घोट अन् तोंडात धर्माचे बोट

पोटात मद्याचे घोट अन् तोंडात धर्माचे बोट


कल्पनेचे देव, कोरिले उदण्ड ! रचिले पाखंड हितासाठी ! किन्नर, गंधर्व, ग्रंथी नाचविले ! अज्ञ फसविले, कृत्रिमाने ! निर्लज्ज सोळवे, त्यांचे अधिष्ठान ! भोंदिती निदान, शुद्रादिका ! धातू दगडाच्या, मूर्तिस भजून ! घंटा वाजवून, स्वतः खाई !

कल्पनेचे देव, कोरिले उदण्ड ! रचिले पाखंड हितासाठी !
किन्नर, गंधर्व, ग्रंथी नाचविले ! अज्ञ फसविले, कृत्रिमाने !
निर्लज्ज सोळवे, त्यांचे अधिष्ठान ! भोंदिती निदान, शुद्रादिका !
धातू दगडाच्या, मूर्तिस भजून ! घंटा वाजवून, स्वतः खाई !

असे महात्मा फुलेंनी देव आणि त्यांचं थोतांड एका क्षणात गारद केले होते. मग त्यांचाच सत्यशोधकी विचार घेऊन गाडगेबाबा म्हणतात की, आजपर्यंत देव कोणी पहायला नाही, देव पहायची वस्तू नाही. जर देवच मानायच असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देव माना असं आपल्या किर्तनातून लोकांना सांगत. पण आजचे तथाकथित बाजारू धंदेवाईक नर्तनकार? हे रेशिमबागेतील ब्राम्हणांच्या तालमीत घडलेले असल्यामुळे भटांनी जी काल्पनिक देव आणि देवळांची नरक नदी त्यांच्या डोक्यात घातली, तीच हे तथाकथित बाजारू लोक गावागावात जाऊन लोकांच्या मस्तकात ह्या काल्पनिक देवांचं खुळ घालून लोकांना वेडे करत आहेत. मग ह्या वेड्यांच्या गर्दीत तथाकथित बाजारू किर्तनकार आपला धंदा तेजीत चालवण्यासाठी अनेक क्लृप्त्या करून अखंड हरिनाम सप्ताहाचे स्तोम माजवून आठ दिवसात गावची गाव लुटतात. पण आठ दिवसानंतर गावच्या हाती उरतं काय? तर फक्त खरकट्या पत्रावळ्या अन् प्लास्टीकचे ग्लास.


पण याच आठ दिवसात ह्या पट्टेबहादरांनी गावकर्‍यांंच्या डोक्याचा जो उकिरडा केला तो थोडीच भरून निघणारा आहे? मग या लोकांपुढे जर एखाद्याने संत नामदेवांनी सांगिलेला की, विठ्ठलच फक्त आपला देव आहे. तुकोबांनी जो माणसातला देव सांगितला, गाडगेबाबांनी जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातला देव सांगितला तो थोडीच पटणार आहे? तर मुळीच नाही. कारण या तथाकथित बाजारू लोकांनी आठ दिवस ही काल्पनिक कथांच्या माध्यमातून देव आणि देवळांची नरकुंड? लोकांच्या मस्तकी घातला त्याचाच हा परिणाम आहे. पण चळवळीतील लोक जेव्हा महापुरुषांचे संदर्भ देऊन या काल्पनिक भाराभर देव आणि देवळांवर प्रश्‍न करतात तेव्हा प्रथम गावकरी व बाजारू किर्तनकारांच्या पृष्ठभागाखाली जाळ लागतो कारण गावकर्‍यांच्या अज्ञानावर आणि काल्पनिक थोतांडावर तर त्या बाजारू किर्तनकारांचा धंदा टिकून आहे? मग ते त्या लोकांची प्रेतयात्रा काढून एकदम खालच्या भाषेत टिका टिप्पणी करतात. मात्र विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याऐवजी धर्म धर्म, धोका धोका करत आरोळी ठोकतात. पण हेच धर्माचे ठेकेदार जेव्हा हाफमॅड अभिनेत्री केतकी चितळे ही तथाकथित देव आणि त्यांच्या खाण्यापिण्यावर बोलते तेव्हा हे पोटभरू किर्तनकार कुठे गोट्या खेळत बसतात? हा आमचा प्रश्‍न आहे.


आज प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामकाज हे फक्त तारखेनुसार चालते, ना कोणत्या पोथी पांचागानुसार. मग लोक नववर्षाची सुरूवात ही ०१ जानेवारी या दिवसानेच करतात आणि करतही राहतील यात वादच नाही. पण जे स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक समजतात ते लोक हिंदू नववर्ष हे गुढीपाढवा या दिवशीच साजरे करा म्हणून आरोळी ठोकतात ते खरंच त्यांचे सर्व व्यवहार हे तिथीनुसारच करतात का? ज्यांना १ जानेवारी या वर्षाच्या पहिल्या दिवसाची ऍलर्जी आहे, त्यांनी आपले सर्व व्यवहार तिथी व पांचांगच बघून करायला काय अडचण आहे? जे स्वतः कट्टर हिंदू म्हणून घेतात ते ३१ डिसेंबर ही शेवटची रात्र म्हणून जोमात साजरी करून चकणा चघळत केव्हा कोमात जातात हे त्यांनाही माहीत नसते. कारण असं की, केतकी चितळेनं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओत तिच्या हातावर गोंदलेला एक टॅटू दाखवला. त्या टॅटू संदर्भातील तिनं एक पोस्टही लिहिली मात्र या व्हिडिओत तिच्या हातात दारुचा ग्लास दिसत असल्याने नेटकर्‍यांनी टीका करताना लिहिलं की, ‘मराठमोळी संस्कृती, नवीन वर्ष आणि आता..?’ तर अन्य एकानं लिहिलं आहे की, ‘आमचं नवं वर्ष फक्त गुढीपाडवा, हिंदू धर्म खतरे में’ त्यावर केतकीनं या नेटकर्‍याला सडेतोड उत्तर देताना लिहिलं आहे की, ‘तुमचा जन्म कधीचा?’



केतकी चितळेला इतरांनी प्रश्‍न विचारले तर चालत का नाहीत? हिंदू धर्माचे पेंटट चितळे गोडसे देशपांडे भिडे एकबोटे कुलकर्णी यांचेकडे काय स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या ब्रम्हदेवाने बहाल केले आहे का? केतकी चितळे ही मद्याचे प्याले फस्त करून धर्माला धोक्यातून बाहेर काढत नसेल कशावरून? केतकी चितळेचे आजचे वर्तन म्हणजे पोटात मद्याचे घोट अन् तोंडात हिंदू धर्माचे बोट असेच म्हणावे का? म्हणून तर ‘देव देवळांचे रहस्य व चिंतन प्रश्‍नावली’ या पुस्तकात ग.ह. राठोड विचारतात की, ३३ कोटी देवांचे प्रिय व आवडते खाद्य पेय पदार्थ कोणते होते? हे पेय खाद्य पदार्थ त्यांना आयते आपोआप मिळत होते की, तयार करावे लागत होते? ते स्वतः तयार करीत होते की दुसरे कोणी? पुर्वीच्या देवलोकांचा सामान्य व आवडता छंद कोणता होता? युद्ध, जुगार, मद्यप्राशन, मांसभक्षण, स्त्रीसंग, शिकार, शेती, व्यापार, नोकरी की राजकारण?


केतकी चितळे म्हणते की, आमचे देवही दारू पितात, काली मातेला तर दारूचा नैवेद्य असतो असं म्हणाली. हे केतकी चितळे हिने जे सांगितले ते खरं आहे पण केतकी चितळेला सांगावं वाटतं की, तथाकथित भट पुरोहितांच्या मेंदूतून निर्माण झालेले देव मद्यच नव्हे तर ते मानवी विष्ठा देखील भक्षण करतात असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे? कारण तुमच्या बापजाद्यांनीच तर आम्हा बहुजनांना सांगितले की, गायीच्या अंगात तेहतीस कोटी देव राहतात. मग प्रश्‍न पडतो की, गाव खेड्यात सकाळी गाय सोडल्यानंतर ती गावकाराला जाऊन जेव्हा ती अन्न भक्षण करते तेव्हा तिच्या अंगात भट पुरोहितांनी भरलेले देव नेमका कोणता आहार घेत असतील? ती ३३ कोटींची माय जेव्हा ब्राम्हणांच्या बिफ निर्यात कंपनीत कापली जाते तेव्हा त्यातील देव काय तिच्या विष्ठेवाटे बाहेर निघून आपला जीव वाचवत असतील का?  



म्हणून तर विद्रोही कवी विश्‍वंभर वराट म्हणतात की,
होते जर देव गायीच्या पोटात| तरी का कापीत यज्ञामधे ॥
देवही कापले गायाही कापल्या| माया ही कापल्या जन्मदात्या॥
गाय फळताना देव कोठे जाती| कोणाला म्हणती त्राहिमाम ॥
म्हणे विश्‍वंभर कथा ऐशा केल्या| मारूनी हेपल्या आभाळाला ॥


केतकी चितळेने केलेल्या पोस्टवर एका युजरनं लिहिलं आहे की, ‘वाह दीदी लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं..!’ त्याची ही कमेंट पाहून केतकी चितळे चांगलीच संतप्त झाली आणि तिनं लिहिलं की, ‘मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका. सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असतो. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही... स्वतःची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका’, असं केतकी चितळेने म्हटले. पण केतकीच्या याच उत्तरानं अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 



सोमरस म्हणजे वाईन असेल तर सावरकर भक्त धर्मवीर आनंद दिघेंचे समर्थक म्हणजे आजचे मुख्यमंत्री यांच्याकडे केतकी चितळेने मागणी करत आग्रह केला पाहिजे की, राज्यासह देशातील सर्व देशी दारू, बिअर व वाईन शॉपींची नावे बदलून सोमरस विक्री केंद्र असे द्यावे. सनातन धर्मात दारू आहेत तर मग देशी दारूची दुकाने सनातन धर्म वाढतच असतीलच तर मग त्या मद्यविक्री करणार्‍या सर्व ठिकाणांना मंदिरे घोषीत करायला काय अडचण आहे? 



आमचे देव ही दारू पितात असे पेताड चितळेंनी खरेच सांगितले. कारण यांचे भुदेव देखील यज्ञ करून गायीच्या गायी फस्त करत तोंडी सोमरसाचे घोट घेत होते याचे अनेक पुरावे पुराण महाभारत व रामायणात आहेत. तथाकथित देवच दारू प्राशन करत होते असं जेव्हा चितळे नावाची ही अभिनेत्री म्हणते तेव्हा आंधळे बहिरे काळे गोरे मडके फडके हे तथाकथित बाजारू किर्तनकार कुठे गायब होतात? अंधारे प्रकरणावर आ वासून उभे राहिलेले हे बाजारू लोक चितळे प्रकरणावर शांत का आहेत? चितळे भिडे आणि भाजपचे खासदार बोलतात तेव्हा हे बाजारू किर्तनकार काय सज्जनगडावर जाऊन ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ हा रामदासांचा श्‍लोक म्हणत सोमरसाचे घोट ओठाखाली घेत बसत असतील का? म्हणून तर विद्रोही कवी विश्‍वंभर वराट म्हणतात की,
ब्राह्मणांचे ग्रंथ मांजराची विष्ठा| म्हणुनीया चेष्टा करीतो मी ॥
जैसे की मांजर हागूनी झाकते| परी न झाकते झाकता ते॥
नाही परखड सत्य ते वदले| चोरून पादले पादरीचे ॥
विश्‍वंभराशी ते दिसले पिवळे| मागुनी सोवळे भरलेले॥


सुषमा अंधारे यांनी जवळपास बारा तेरा वर्षापूर्वीच रेडा प्रकरणार प्रकाश टाकून जो समाज किर्तनकारांनी येडा केला होता त्याला शहाण केलं. पण हा व्हिडिओ पाहून आताच जागे झालेले आणि येड्यांचा पोटमुकादम असलेले जे तथाकथित बाजारू किर्तनकार एवढे दिवस अंधारात खितपत पडले होते ते आंधळे पांगळे गाडगे मडके एका क्षणात जागे झाले अन् गोंगाट करून मेंगट बोलू लागले पण त्या प्रश्‍नांची उत्तरे तेच काय त्यांचा ब्रम्हदेवही देऊ शकणार नाही कारण त्यांचं हे थोतांड तर्काच्या पुढे चारीमुंड्या चीत होत. सुषमा अंधारे यांच्यावर भुंकणारे हे रेशीमबागेच्या गल्लीत भुंकणारे बांडे लोक केतकी चितळे प्रकरणावर शांत का आहेत? 



केतकी चितळे बोलली म्हणजे दस्तुरखुद्द ब्रम्हदेवच बोलला अस या तथाकथित बाजारू किर्तनकारांना वाटत असेल का? म्हणून तर डॉ. संग्राम पाटील हे फेसबुकवर म्हणतात की, ‘जे वारकरी सुषमाताई विरूद्ध पेटून उठले होते ते थंडीमुळे गारठले की काय? देवांना दारुडे म्हटले कुणीतरी, ही बातमी पोहोचली नाही का?’ म्हणून तर विद्रोही कवी विश्‍वंभर वराट म्हणतात की,
नामयाची गादी मळून सोडती| अस्वले झुलती विणाधारी ॥
मुखा येईल ते उगी बरळती| कसोटी लावती ना कोणती ॥
जयघोष करी विठ्ठला विठ्ठला| जीव अडकला पाकिटात ॥
किर्तन म्हणजे नव्हे तो करार|बोले विश्‍वंभर हभपला ॥

नवनाथ रेपे

Post a Comment

Previous Post Next Post