कराड: कळंत्रेवाडी,ता.कराड येथील अक्षरश: हमाली करून चरितार्थ चालवणाऱ्या अल्पभूधारक कुटुंबातील जवळपास चार कोंबड्या अज्ञात कारणामुळे दगावल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, याबाबत स्थानिक प्रशासनाला कल्पना देऊन सुद्धा कोणतीही हालचाल झाली नसल्यामुळे प्रशासनापुढे अखेर हतबल होत ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृत कोंबड्या टाकून नुकसान भरपाईची मागणी करीत सौ सुभद्रा सूर्यवंशी यांनी अनोखे आंदोलन केल्याची घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून सौ सुभद्रा सूर्यवंशी यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यानंतर कोंबड्यांच्या खुराड्याकडे लक्ष गेले असता कोंबड्या मृत असल्याचे आढळून आले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला याची सर्व माहिती देऊन जवळपास २४ तास उलटून गेले असून सुद्धा कोणतीच कार्यवाही होत नसल्याने स्थानिक प्रशासनापुढे हतबल होत नुकसानग्रस्त महिला सौ सुभद्रा दादासो सूर्यवंशी यांनी मृत कोंबड्यांची पाटी डोक्यावरती घेऊन तडक ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मृत कोंबड्यांचा ढीग मारून अनोखे आंदोलन केले. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने मला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सौ सुभद्रा सूर्यवंशी यांनी यावेळी केली आहे.
Tags:
कराड