गडचिरोली: हिवाळी अधिवेशन दरम्यान राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये बोनस जाहीर केले. मात्र दोन महिन्याचा काळ लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे शेतकरी बोनसच्या प्रतिक्षेत होता. आज राज्य सरकारच्या मंत्री मंडळाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनस करीत १ हजार कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. असे असले तरी, जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बोनस खात्यात केव्हा जमा होणार, याकडे लक्ष लावून आहेत.
शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीर आहे, असा गवगवा प्रत्येक सरकार करते. दरम्यान शेतकऱ्यांना तुर्त दिलासा देण्यासाठी योजनांची घोषणाही करते. परंतु योजनेच्या अंमलबजावणीला किती काळ लागले याचा काही नेम राहत नाही.. असाच प्रकार धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस संदर्भात प्रत्येयाला येऊ लागला आहे. डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन
दरम्यान राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १५ हजार रुपये बोनस जाहीर केले. बोनस जाहीर होताच जनप्रतिनिधींनी होर्डिंग लावून राज्य सरकारचा अभिनंदनही केला. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र दोन महिन्याचा काळ लोटूनही खात्यात बोनसची रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे बोनसची घोषणा हव्यातच विरणार तर नाही, असा संशय व्यक्त केला जात होता. त्यातच आज राज्य मंत्रीमंडळाने जाहीर केलेल्या बोनस करीत १ हजार कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु बोनस खात्यात केव्हा जमा होणार, असा शेतकऱ्यांचा सवाल मात्र कायम आहे.
Tags:
ब्रेकींग