ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवा- माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी, ..... ईव्हीएम घोटाळा करता येत असल्यानेच राज्यात ४८ जागा जिंकण्याचा अमित शहांचा दावा ..... ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवा- माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी, राज्यभरात भारत मुक्ती मोर्चाच्या ईव्हीएमविरोधी राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचा परिणाम ....


गडचिरोली : महाराष्ट्रात ४८ जागा जिंकून आणू, असा दावा भाजपचे दिग्गज नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोणत्या आधारावर करत आहेत. त्यांच्या या दाव्यामागे नक्की काहीतरी षडयंत्र आहे. देशात मते देण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात, त्यामुळेच ते एवढे खात्रीशीर दावे करू शकतात, असा आरोप करतानाच ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपर पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. दरम्यान भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचा परिणाम झाल्याने विविध राजकीय पक्ष आता ईव्हीएमऐवजी आता बॅलेट पेपरची मागणी करताना दिसत आहे.
खैरे म्हणाले, राजकीय नेत्यांकडून निवडणुकांपूर्वी निवडणुकीच्या विजयाचा विश्‍वास व्यक्त करणे, संबंधित जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा करणं काही नविन नाही. याच पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महाराष्ट्रात ४८ जागा जिंकून आणणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावरुन ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ईव्हीएम मशीन नको. बॅलेट पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत.
अमित शहा मोठ्या मोठ्या घोषणा करतात. ४८ जागा महाराष्ट्रात जिंकू, ३६ जागा बिहारमध्ये जिंकू. हे कोणत्या मुद्यावरून सांगता. आता जनता ते मान्य करणार नाही. हे सगळं सॅटेलाइटद्वारे मॅन्युप्युलेट केलं जात आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन नको आम्हाला बॅलेट पेपरच हवा, अशी मागणी आमचे सर्व नेते करणार आहेत. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने ही मागणी अधिक आक्रमकपणे केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने राज्यभरात शिवगर्जना अभियानाला सुरुवात केली आहे. याअंतर्गत ठाकरे गटाचे विविध कार्यकर्ते राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शिवगर्जना यात्रेतील दौरा गडचिरोलीत आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. 
शिवसेना फोडण्याचं नीच काम मिंधे गटाने केलं आहे. फडणवीसांनी त्यांना स्ट्रॉंग केलं आहे. विकासाचं काम नाही. नोकर्‍या नाही. महागाई वाढली. एवढं असताना मिंधे गटानं स्ट्रॉंग केलं जातंय, हेच सांगायला आम्ही इथे आलो आहोत, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी येथील एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. इथले फक्त ४ टाकून दिलेले नेते आहेत, तेच शिंदे गटात गेले. बाकीचे एकही महिला आघाडी किंवा युवासेनेतील नेते शिंदे गटात गेला नाही, हे अभिमानाने सांगावं वाटतं, अशी भावना खैरे यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post