शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्या:आ.धर्मराव बाबा आत्राम *एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे महाराजस्व अभियान संपन्न*



अहेरी :- आदिवासी बहुल भागात विविध लोककल्याणकारी योजना घेऊन शासन आपल्या दारी येत आहे. या योजनांचा पुरेपूर लाभ घ्या असे आवाहन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.

एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे तहसील कार्यालय मार्फत 31 मे रोजी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजस्व अभियान कार्यक्रम घेण्यात आले. या अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी तहसीलदार पि. व्ही.चौधरी,प्रमुख पाहुणे म्ह्णून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, नायब तहसीलदार भांडेकर,विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुकाध्यक्ष श्रीकांत कोक्कुलवार,कसनसूरचे सरपंच कमला ठाकरे,घोटसुरचे सरपंच साधू कोरामी,माजी सभापती बबिता मडावी,पोलीस पाटील रैजी मडावी,कोटमी चे उपसरपंच महादेव पदा, मानेवारा चे उपसरपंच देविदास मडावी,वैद्यकीय अधिकारी पुंगाटी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना एटापल्ली तालुक्यातील कसनसूर परिसरात बरेच गावे असून या गावांतील नागरिकांना महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने एकाच मंचावर विविध विभागाकडून विविध योजनांची माहिती दिली जात आहे. एवढेच नव्हे तर या महाराजस्व अभियानातून या भागातील नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र घरपोच दिले जाणार असल्याने नक्कीच या भागातील नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे स्वतःचा आणि समाजाच्या विकासासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महसूल विभागामार्फत एटापल्ली तालुक्यात एकूण 4 ठिकाणी महाराजस्व अभियान घेण्यात आले असून कसनसूर येथील शासकीय आश्रम शाळा परिसरात घेण्यात आलेला हा शेवटचा शिबीर होता. विविध कल्याणकारी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी कसनसूर,कोत्ताकोंडा,घोटसुर,मानेवारा,
गुंडम,सेवारी,कुकेली, कोटमी,कसूरवाही, जवेली,चोखेवाडा आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अभियानात जात प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, जॉब कार्ड,जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र असे विविध दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

महाराजास्व अभियानात विविध विभागाकडून स्टॉल लावून नागरिकांना माहिती देण्यात आली. मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन पाहणी करतानाच विविध योजनांची माहिती जाणून घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तहसीलदार पी व्ही चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी,तलाठी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post