मुंबई : ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नियमित कर्जफेड केली आहे अशा सर्वांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान रक्कम येत्या सप्टेंबर महिन्यापासून जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानपरिषदेत दिली. अतिवृष्टी व कीड इत्यादींमुळे शेतकऱ्यांचे यंदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आमचे सरकार आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम मदत म्हणून शेतकऱ्यांना देणार असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
अतिवृष्टी व कीड इत्यादींमुळे शेतीचे झालेले नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोनच्या (Drone Camera) सहाय्याने फोटोची मदत घेतली जाणार आहे, सोबतच झालेली नुकसान भरपाई देण्याकरिता ‘एनडीआरएफ’ (NDRF) निकषांच्या दुप्पटीने ,मदत देण्याचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. यापूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत घोषित केल्यावर प्रत्यक्षात त्याचा लाभ देण्यास ७ ते ८ महिने लागले परंतु आम्ही तातडीने शेतकऱ्यांना मदत देणार आहोत असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात अशा सर्वांना ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार असल्याची माहिती आहे व लवकरच ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
Tags:
मुंबई