मंत्रिपद कायम राहण्यासाठी येड्यासारखी बडबड, प्रकाश आंबेडकरांनी जनसमुदायाच्या साक्षीनं आठवलेंना फटकारलं

अकोला:- राज्य कसे चालवायचे हेच माहीत नाही म्हणून आता आपण बघत असाल की आपल्याकडे एक जोकर आहे. पंतप्रधानांना महागाई थांबवावी हे आमचे आवाहन आहे. महागाई थांबली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आर्थिक संकट वाढल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आता अनेक गोष्टी चालल्या आहेत. कुणाचे तरी गुणगान गातात, कुणी लोटांगण घालतात आणि काही जण मंत्रिपद कायमचे टिकले पाहिजे म्हणून येड्यासारखे बडबड करतात. विजया दशमीला जाणीवपूवर्क विचारपूर्वक बाबासाहेबांनी हे पाऊल उचलले. कारण, जो बहिष्कृत वर्ग होता त्याचे बहिष्कृतपण निघाले पाहिजे, त्याला माणसाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याला समतेचा अधिकार मिळाला पाहिजे. त्याला इज्जतीने जगता यावे. म्हणून त्यांनी बुद्धाच्या विचाराची कास धरली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आज काही महाभाग असे म्हणायला लागले की चुकून माकून बाबासाहेबांनी हा मार्ग घेतला. दुर्दैवाने जे जे विचारवंत अशा नेत्यांच्या पाठीमागे उभे राहतात. मला त्या विचारवंताची कीव करावी वाटते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती विचारपूर्वक चालली. परंतू, त्या विचारपूर्वक उचललेल्या पावलाला स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी आता काही जण बाबासाहेबांचे ते पाऊल चुकीचं होतं, असे म्हणतात, अशी असणारी परिस्थिती आहे. अशा विचारवंताचा त्यांच्या नेत्यांचा, माननाऱ्यांचा आम्ही या जाहीर सभेमध्ये धिक्कार करतो, असे वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. अकोला जिल्ह्यात गेल्या ३८ वर्षापासून सुरु असलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत बोलत होते.

अकोल्यात काही जणांच्या अंगामध्ये आलेलं दिसते आहे, आता थेट सरपंचाच्या निवडणुका आहेत. ग्रामपंचायतीमध्ये आम्ही लक्ष घालत नव्हतो, पण सरपंचाच्या निवडणुकीमध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत. पक्षाच्या वतीने आम्ही उमेदवार उभा करणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही तिथे लक्ष घालणार नाही. मग एकमेंकाच्या उरावर बसायचे ते खुशाल बसा. पण सरपंच हा निवडून दिला पाहिजे, असं ते म्हणाले. आपण पुन्हा एक सभा या ठिकाणी घेणार आहोत. त्यावेळी सविस्तर मांडणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आपण पक्षाबरोबरच राहायचे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचेच ऐकायचं आपली वाटचाल जी चालली आहे, ती कायम या ठिकाणी ठेवली पाहिजे. आपली एकजूट ही सगळ्यात महत्वाची आहे. लोकसभेमध्ये जे लोक आरोप करत होते, आता तेच बीजेपीकडे गेले अन् तेच म्हणत आहेत की प्रकाशराव आपण एकत्र बसू आता मीच त्यांना हाडहूड करायला लागलो. इथे पूर्णपणे लोकशाही राहिली पाहिजे, विचारस्वांतत्र राहले पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे त्या ठिकाणी ठणकावून सांगितले पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post